नारायणगाव परिसरात पावसाचा हाहाकार
नारायणगाव (वार्ताहर) – नारायणगाव, येडगाव, धनगरवाडी आदी परिसरातील गावांमध्ये परिसरात आज (दि. 22) दुपारी झालेल्या सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले. याचा सर्वाधिक फटका नारायणगाव व परिसरातील गावांना बसला आहे. सतत पडणाऱ्या पाण्याचा प्रवाहामुळे नुकतेच लागवड केलेले बटाटा बियाणे, कांदा रोपे व ठिबकचा नळ्या वाहून गेल्या. सतत पडणाऱ्या मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील सुपीक माती वाहून गेली आहे.
सध्या करोनाच्या महामारीमुळे शेतकऱ्यांसह सर्व सामान्य नागरिक त्रास होऊन आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामध्ये अनेकदा आपत्ती तसेच 13 मे रोजी झालेल्या गारपिटीमुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यावेळी उन्हाळी टोमॅटो या प्रमुख पिकासह बाजरी, भाजीपाला पिके, फळबागा आदी पिकांसह पोल्ट्री शेड, जनावरांचे गोठे व घरांचे नुकसान झाले होते. त्यानंतर 3 जून रोजी झालेल्या निसर्ग वादळाचा दुसऱ्यांदा फटका या भागातील शेती पिकांना बसला होता. गेली 4 ते 5 दिवसांपासून पाऊस सुरु आहे. नुकतीच लागवड केलेल्या बटाटा, कांदा या प्रमुख पिकांसह काढणी सुरू असलेल्या भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. पाच महिन्यांत या भागातील शेतीपिकांचे तिसऱ्यांदा नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा पुरता हतबल झाला आहे. हाता तोंडाशी आलेला घास या ढगफुटीने हिरावून घेतला आहे.
कुकडी प्रकल्पात पाणीसाठा वाढणार
गेली आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे जुन्नर तालुक्यातील धरणांतील पाण्याच्या पातळीमध्ये चांगली वाढ होणार आहे. आज कुकडी प्रकल्पात एकूण 73.83 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
दोनदा पंचनामे, पण हाती काही नाही…
नारायणगाव, येडगाव, धनगरवाडी परिसरात 13 मे व 22 सप्टेंबर दरम्यानच्या पाच महिन्यांत तीन वेळा उभ्या पिकांचे नुकसान झाले. कोट्यवधी रुपयांचा भांडवली खर्च, कष्ट वाया गेले. दोन वेळा पंचनामे झाले, मात्र, अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. आणि त्यामध्ये या ढगफुटीमुळे पुन्हा पिकांचे नुकसान झाले.