बारामती (प्रतिनिधी) : घाणीचे साम्राज्य दूर झाल्याने शहरातील सायली हिल परिसरातील 1 हजार कुटुंबांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.सलग 8 दिवसांच्या श्रमदानातून येथील मंगेश नाना ओमासे मित्र मंडळाने लोक श्रमदानातून हा परिसर चकाचक केला आहे. मित्र मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बारामती शहरात भिगवन रोड लगत असलेल्या सायली हिल परिसरात घाणीचे साम्राज्य झाले होते. परिसरात असलेल्या मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात कचरा पडला होता. झुडपांचे प्रमाणदेखील वाढले होते. त्यामुळे या परिसरात भटके कुत्रे डुकरांचा सुळसुळाट झाला होता . नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. डुकरांच्या धडकेने काही लहान मुले देखील जखमी झाली होती. त्यामुळे येथील नागरिक हैरान झाले होते. त्यानंतर ही बाब येथील मंगेश नाना ओंबासे मित्रमंडळाच्या निदर्शनास आली.
सायली हिल येथील शंभरहून अधिक नागरिकांच्या सहभागाने मित्रमंडळाने स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतला. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून श्रीनिवास पाटील यांच्या ट्रॅक्टरच्या साह्याने मोकळा भूखंडतील झाडेझुडपे काढण्यात आली . परिसरातील इमारतींच्या अवतीभवती झालेला कचरा साफ करण्यात आला.
परिसरात झालेले घाणीचे साम्राज्य तसेच कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. लॉकडाउन काळात पशासनाचे सर्व नियम पाळून सामाजिक अंतर ठेवून प्रत्येक रविवारी येथील नागरिकांनी मित्रमंडळाच्या साथीने श्रमदान केले.
नगरपरिषद प्रशासनाचे सहकार्य देखील मित्रमंडळाने मिळविले. त्यामुळे सायली हिल परिसर चकाचक झाला आहे. लॉकडाऊनच्या काळातदेखील सामाजिक अंतर ठेवून नागरिकांनी श्रमदान केले त्यामुळे एकजुटीचा सायली हिल पॅटर्न म्हणून त्याचे परिसरात कौतुक होत आहे. याच काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्षय डांगे यांच्या सहकार्याने मित्रमंडळाने शासकीय अधिकाऱ्यांना शानीटायझरचे वाटप केले.
एकजुटीचा सायली हिल पॅटर्न
सायलीहिल परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. या परिसरात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली होती. भटके कुत्रे व डुकरांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त होते. त्यामुळे मित्र मंडळाच्या वतीने व येथील नागरिकांच्या श्रमदानाच्या सहकार्याने हा परिसर स्वच्छ करण्यात आला. यासाठी आठ दिवसांचा कालावधी गेला. नागरिकांच्या एकजुटीमुळे हे शक्य झाले. मित्र मंडळाच्या वतीने या परिसरात वृक्षारोपणाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. वड कडूनिंब व जांभूळ असे 101 वृक्षांची लागवड या परिसरात येत्या दोन दिवसात केली जाणार आहे. त्याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. नागरिकांनी मोकळ्या भूखंडावर कचरा टाकू नये यासाठी जनजागृती करण्यात आली आहे. सायली हिल येथील नागरिकांच्या एकजुटीमुळे हे शक्य झाले. लोकसहभागाचे महत्त्व या वेळी जाणवले अनेक उपक्रम हाती घेऊन लोकसहभागातून ते यशस्वी करता येऊ शकतील.
(मंगेश ओमसे, सामाजिक कार्यकर्ते)