मुंबई – भाजपा नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामधील वादाचे पडसाद मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये उमटताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतपाटील यांनी राज्य सरकारला भाजपा पूर्णपणे किरीट सोमय्या यांच्या पाठीशी असून त्यांचा आवाज कोणालाही दडपता येणार नाही असा इशारा दिला.
तर याच विषयावरून शिवसेनेने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर अग्रलेखाच्या माध्यमातून निशाणा साधला होता. आता चंद्रकांत पाटील यांनी या अग्रलेखाला उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील
राजकारणात संघासारखे प्रसिद्धीपराङ्मुख असून चालत नाही. म्हणजे प्रसिद्धीकडे पाठ फिरवून चालत नाही. हो, जरा वेगळा शब्द वापरला की तुम्हाला अर्थ सांगावा लागतो. राजकारणात प्रसिद्धी तर हवीच. ती तुम्ही मला मिळवून देता म्हणून तुमचे आभार,”
काय आहे सामनाच अग्रलेख
‘ ईडी ‘ शी लढताना तोंडास फेस येईल , असे चंद्रकांत पाटलांनी सांगणे हा अहंकार आहे . ‘ ईडी ‘ मुळे कोणाच्या तोंडास फेस येतोय की काय ते नंतर पाहू , पण महाराष्ट्राचे ठाकरे सरकार ‘ कें द्रीय ‘ जोर लावूनही पडत नाही म्हणून येथील विरोधी पक्षाच्या तोंडास आलेला फेस स्पष्ट दिसत आहे . भाजपचे माजी खासदार सोमय्या यांचे आरोप व बाता या नागपूरच्या गोटमारीसारख्याच आहेत . मुंबई लोकलमध्ये विषारी वायू सोडण्याचा अतिरेक्यांचा कट होता . पोलीस त्या तपासात गुंतले असतानाच विरोधी पक्ष राज्यात भलतेच प्रश्न निर्माण करून पोलिसांवरील ताण वाढवीत आहे . विरोधकांनी निर्माण केलेल्या दुर्गंधीमुळेही जनजीवन विस्कळीत होऊ शकेल . विरोधकांना राज्यातील जनतेच्या जिवाशी खेळायचे आहे काय ? एकदा तसे जाहीर करा म्हणजे झाले .
‘ ईडी ‘, ‘सीबीआय’सारख्या केंद्रीय तपास यंत्रणा आपल्या खिशातच आहेत व त्यांच्या जोरावर आपण राजकीय विरोधकांना धमक्या देऊ शकतो, असे महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांना वाटत आहे व तसे धमकीसत्र त्यांनी चालवले आहेच. काही झाले की, हे लोक फक्त ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’च्याच नावाने धमक्या देतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना धमकावले आहे की, ”ईडी’शी लढताना तोंडाला फेस येईल.” पाटील यांना ‘ईडी’चा इतका अनुभव कधीपासून आला? हसन मुश्रीफ यांच्यावर माजी खासदार सोमय्या यांनी काही आरोप केले आहेत. हे आरोप चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेने केले असावेत अशी मुश्रीफ यांना खात्री आहे, कारण आरोप करणाऱ्या दोघांच्याही तोंडी ‘ईडी’चे नाव आहे. मुश्रीफ हे मंत्री आहेत व कोल्हापुरात त्यांचे राजकीय वजन आहे. कालच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपचा सुपडा साफ झाला व चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून पळ काढून कोथरुडला जाऊन निवडणूक लढवावी लागली. कोथरुडला विजय मिळविताना पाटलांच्याही तोंडाला तसा फेसच फेस आला होता. निवडणुकांच्या आखाडय़ात हे व्हायचेच. प्रश्न तो नसून केंद्रीय तपास पथकांच्या राजकीय गैरवापराचा आहे. ‘ईडी’शी लढताना तोंडास फेस येईल, असे चंद्रकांत पाटलांनी सांगणे हा अहंकार आहे. ”आमची ‘वर’ सत्ता आहे, आम्ही काहीही करू शकतो,” अशी भाषा श्री. पाटील यांनी यापूर्वी अनेकदा केली आहे. ”केंद्रीय तपास यंत्रणांची हत्यारे चालवून आम्ही विरोधकांचे कोथळे काढू, बेजार करू” ही त्यांची नियत आहे व महाराष्ट्राच्या परंपरेला हा अहंकार शोभणारा नाही. श्री. शरद पवार यांनी मृणालताई गोरे दालनाच्या उद्घाटनप्रसंगी नेमकी तीच खंत व्यक्त केली आहे. पवार एकदम भूतकाळात गेले व म्हणाले, ”त्या काळात
अनेकदा वाद
झाले. मृणालताई असताना सदनामध्ये अनेकदा वाद व्हायचे, पण ते राज्याच्या हिताचे असायचे. एक सुसंवाद असलेला पाहायला मिळायचा. तो सुसंवाद आज पाहायला मिळत नाही. आता कोथळा काढायची भाषा केली जाते.” श्री. पवार यांची ही खंत योग्यच आहे. सुसंवाद संपला आहे व राजकारण द्वेषाचे व अहंकाराचे झाले आहे. महाराष्ट्रातील भाजपचे लोक संसदीय लोकशाहीचे सर्व संकेत पायदळी तुडवत आहेत. राज्याचे पोलीस, तपास यंत्रणा, प्रशासकीय व्यवस्थेवर अविश्वास दाखवून थेट दिल्लीच्या कानात बोटे घालीत आहेत. राज्यपालांपासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंत प्रत्येक जण महाराष्ट्र सरकारला शत्रू मानून वागत आहे. राज्य खिळखिळे करायचे, राज्याची गती रोखायची, बेबंद आरोप करून खळबळ माजवायची हेच त्यांचे धोरण आहे. एखाद्या मंत्र्याने वा घटनात्मक पदावरील व्यक्तीने काही चुकीचे काम केले असेल तर राज्यात त्याबाबत कायदेशीर दखल घेणारी यंत्रणा आहे. पोलीस, लाचलुचपत प्रतिबंधक खाते, आर्थिक गुन्हे शाखा, लोकायुक्त त्यासाठी आहेत; पण विरोधी पक्ष थेट ‘ईडी’ व ‘सीबीआय’च्याच बाता मारतात! चंद्रकांतदादा हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत याचे भान तरी त्यांनी ठेवावे, पण चंद्रकांतदादांचे वागणे, बोलणे व फुकाचे डोलणे राज्यात कोणीही गांभीर्याने घेत नाही. त्यांच्या मुखातून भाजपची लक्तरेच लोंबत असतात. एकतर ते ‘ईडी’, ‘सीबीआय’सारख्या संस्थांना बदनाम करीत आहेत. या संस्थांवरचा लोकांचा विश्वास उडेल असे त्यांचे वर्तन आहे. दुसरे एक गंभीर विधान पाटलांनी केले. सध्याच्या सरकारकडे पैसे खाण्याचेसुद्धा स्किल नाही. पाटील म्हणतात तसे हे स्किल माजी मंत्री म्हणून त्यांच्याकडे आहे व याबाबतची ‘पीएच.डी.’ त्यांनी केली असावी. त्यामुळे ‘ईडी’ने पाटील व इतर
माजी मंत्र्यांच्या पैसे खाण्याचा हिशेब
एकदा घ्यायला हवा व आधीच्या सरकारातील मंत्र्यांच्या तोंडास फेस आणायला हवा. स्वतः श्री. फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे राज्याचे प्रशासन त्यांना माहीत आहे. ज्या प्रशासनाकडून त्यांनी कारभार केला तेच प्रशासन आजही आहे. पुन्हा प्रशासनातले अधिकारी विरोधी पक्षनेत्यांना गोपनीय रीतीने भेटत असतात हा स्फोट त्यांनीच केला आहे. मग ऊठसूट ‘ईडी’, ‘सीबीआय’च्या धमक्या का देता? केंद्रीय तपास यंत्रणांचा हा दुरुपयोग नाही, तर काय? महाराष्ट्रातील मंत्र्यांवर, सरकारवर आरोप करणाऱ्याला केंद्र सरकार लगेच ‘झेड’ दर्जाची केंद्रीय सुरक्षा पुरवून स्वतःचेच हसे करून घेते. सत्य असे आहे की, ‘ईडी’मुळे कोणाच्या तोंडास फेस येतोय की काय ते नंतर पाहू, पण महाराष्ट्राचे ठाकरे सरकार ‘केंद्रीय’ जोर लावूनही पडत नाही म्हणून येथील विरोधी पक्षाच्या तोंडास आलेला फेस स्पष्ट दिसत आहे. भाजपचे माजी खासदार सोमय्या यांचे आरोप व बाता या नागपूरच्या गोटमारीसारख्याच आहेत. ज्यांच्यावर आरोप केले जात आहेत त्यातील अनेकांनी त्यांना कोर्टात खेचले आहे. कोल्हापूरचा पहेलवान गडी मुश्रीफ तर कुणाला ऐकणार नाही. सोमय्या कोल्हापुरात पोहोचले असते तर कोल्हापूरकरांच्या दैवतांवरही त्यांनी आरोप केले असते. ते उठता बसता, जागेपणी, झोपेतही आरोप करतात. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था व पोलिसांवर ताण वाढतो. मुंबईत दहशतवाद्यांचे नेटवर्क पकडण्यात आले आहे. मुंबई लोकलमध्ये विषारी वायू सोडण्याचा अतिरेक्यांचा कट होता. पोलीस त्या तपासात गुंतले असतानाच विरोधी पक्ष राज्यात भलतेच प्रश्न निर्माण करून पोलिसांवरील ताण वाढवीत आहे. विरोधकांनी निर्माण केलेल्या दुर्गंधीमुळेही जनजीवन विस्कळीत होऊ शकेल. विरोधकांना राज्यातील जनतेच्या जिवाशी खेळायचे आहे काय? एकदा तसे जाहीर करा म्हणजे झाले.