नवी दिल्ली – “काश्मीर फाईल्स’ या सिनेमाच्या निमित्ताने भाजप वातावरण दूषित करत आहे. काश्मिरी पंडीतांना काश्मीरमधून हाकलून दिले जाण्याच्या मुद्यावरून द्वेषभावना पसरवल्या जात आहेत, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
अशा चित्रपटाला परवानगी दिली जायला नको होती. मात्र या चित्रपटाला आता टॅक्स फ्री केले जाते आहे. देशाच्या ऐक्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेच आता लोकांना हा चित्रपट बघण्याचे आवाहन करत आहेत. यातून लोकांच्या मनात राग आणि द्वेष उफाळून येतो आहे. असे पवार म्हणाले. दिल्ली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अल्पसंख्य विभागाच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते.
काश्मिरी पंडीतांना काश्मीरमधून घालवून देण्यात आले आहे. मात्र मुस्लिमांनाही अशाच प्रकारे लक्ष्य केले गेले. काश्मिरी पंडीतांवर आणि मुस्लिमांवरही पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी हल्ले केले. जर केंद्रातील मोदी सरकारला खरोखर काश्मिरी पंडीतांची काळजी वाटत असेल, तर त्यांच्या पुनर्वसनासाठी सर्व काही करण्यात यावे. मात्र त्यांच्या मनात अल्पसंख्यांकांविरोधातील राग निर्माण केला जाऊ नये, असेही पवार म्हणाले.
काश्मिरी पंडीतांवरील हल्ल्यांच्या वादात पंडीत जवारलाल नेहरू यांचे नाव गोवल्याबद्दल पवार यांनी भाजपवरही टीका केली. पंडीतांवर हल्ले झाले तेंव्हा विश्वनाथ प्रताप सिंहांचे सरकार सत्तेत होते, असे त्यांनी सांगितले.
व्ही.पी. सिंहांच्या सरकारला भाजपचा पाठिंबा होता आणि मुफ्ती मोहम्मद सैद हे गृहमंत्री होते. तर नंतर भाजपकडून दिल्लीतून लोकसभेची निवडणूक लढवणारे जगमोहन हे जम्मू काशमीरचे राज्यपाल होते, याचीही आठवण पवार यांनी करून दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा गेल्या तीन दिवसातील हा दुसरा कार्यक्रम होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापना दिनी म्हणजे 10 जूनला दिल्लीत मोठा मेळावा घेण्याचे नियोजन पक्षाच्यावतीने करण्यात येते आहे.