भावही गडगडले : हवामानातील बदलामुळे टोमॅटोला फटका
पवनानगर (प्रतिनिधी) – देशासमोर करोना व्हायरसचे संकट उभारल्याने अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. याच पार्श्वभुमीवर शेतमालाच्या विक्रीवरही मोठा परिणाम झालेला आहे. असे असतानाच आता टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. टोमॅटोवर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने झाडे जळून जात असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
सततच्या वातावरणातील बदलामुळे मावळ तालुक्यातील बागायती क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. मावळ तालुक्यातील येळसे, कोथुर्णे, शिवली, वारू आदी गावांतील शेतकऱ्यांनी काकडी, टोमॅटो यासह अन्य पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत होणाऱ्या बदलामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. टोमॅटोवर मागील काही दिवसांपासून करपा रोग पडल्यामुळे उत्पादावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे. या रोगाचा प्रसार अतिशय जलद होत असल्यामुळे परिसरातील टोमॅटो पीक धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांनी औषध फवारणी करुन सुद्धा करपा अटोक्यात येत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसापासून टोमॅटोचे भाव गडगडले आहेत. त्यातच फवारणीमुळे शेतकऱ्याला झळ बसत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
टोमॅटोवर तीन वेळा कीटकनाशक औषध फवारणी करुनही करपा रोग आटोक्यात आला नाही. अगोदरच बाजारभाव नसल्याने उत्पादन खर्चही निघत नाही त्यातच फवारणीसाठी जादा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे 10 टक्के सुद्धा खर्च वसूल होणार की नाही याची चिंता सतावू लागली आहे.
– लालू ठाकर, शेतकरी