सातारा-पुणे सेवेबाबत प्रवाशांमध्ये असंतोष; महामंडळाचे मात्र दुर्लक्ष
सातारा – सातारा-स्वारगेट (पुणे) विनावाहक-विनाथांबा ही एके काळची एस. टी. महामंडळाची आदर्शवत आणि सर्वसामान्यांना हवीहवीशी वाटणारी सेवा आता नकोशी झाली आहे. साध्या (लालपरी) बसेसच्या फेऱ्या कमी करुन या मार्गावर शिवशाही बसेसच्या फेऱ्या वाढवल्याने प्रवाशांना 65 रुपये अतिरिक्त आर्थिक भुर्दंडाबरोबर जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. महामंडळाचे उत्पन्न वाढत असले तरी शिवशाही बसेसच्या महागड्या फेऱ्या लादल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.
सातारा आगाराने काही वर्षांपासून सातारा-स्वारगेट (पुणे) विनावाहक, विनाथांबा सेवा सुरू केली होती. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने या मार्गावर बसेसच्या फेऱ्या वाढून उत्पन्नातही वाढ झाली होती. शिस्तबद्ध आणि चांगल्या नियोजनामुळे ही सेवा अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती. साताऱ्याहून पुण्याला जाणाऱ्या आणि पुण्याहून साताऱ्याला रोज येणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा महत्त्वाची ठरली होती. चाकरमान्यांना या सेवेचा फायदा होत होता. अनेक वर्षांपासून ही सेवा फायदेशीर ठरली असताना शिवशाहीचे भूत महामंडळाच्या मानगुटीवर बसल्याने सध्या वेगळेच चित्र दिसत आहे.
“आरामदायी प्रवास’ या गोंडस नावाखाली महामंडळाने शिवशाही बससेवा सुरू केली आहे. सातारा-स्वारगेट प्रवासासाठी साध्या बसचे तिकीट 135 रुपये आहे तर शिवशाही बसचे 200 रुपये तिकीट आहे. त्यामुळे प्रवाशांना 65 रुपयांचा आर्थिक भुर्दंड दिला जात आहे. याबद्दल प्रवासी वर्गात तीव्र नाराजी असताना वरिष्ठांच्या आदेशानुसार शिवशाहीच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. सातारा-पुणे ही सेवा सकाळी 6 पासून रात्री 8.30 वाजेपर्यंत सुरू आहे. दर 15 मिनिटांनी या बसेस सातारा व पुणे येथून सोडण्यात येतात. दिवसाला 58 फेऱ्या होतात. यापूर्वी साध्या बसेसच्या 40 आणि शिवशाहीच्या 12 फेऱ्या होत्या. आता साध्या बसेसच्या 28 आणि शिवशाहीच्या 28 फेऱ्या करण्यात आल्या आहेत.
शिवशाहीच्या एका फेरीमागे महामंडळाला दोन हजार 795 रुपये जादा उत्पन्न मिळत आहे. दिवसाला 16 फेऱ्या वाढल्याने 44 हजार 720 रुपये जादा उत्पन्न मिळणार असल्याने या मार्गावर शिवशाही बसेसच्या फेऱ्या वाढवण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. या बसेसवरील खासगी चालकांच्या वाहन चालवण्याच्या परवान्याबाबतही साशंकता आहे. गेल्या काही महिन्यात शिवशाही बसेसचे वाढते अपघात चिंताजनक आहेत. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसून वर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे शिवशाही बसेसच्या फेऱ्या कमी करून पूर्वीप्रमाणे साध्या बसेसच्या फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.
अपघातांची मालिका सुरुच
शिवशाही बसेस सुमारे दोन वर्षांपूर्वी महामंडळात दाखल झाल्या; परंतु ही सेवा सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या बसेसवर खासगी चालक असल्याने महामंडळातील चालकांच्या भरतीवर संक्रात येणार असल्याने अनेक संघटनांनी या सेवेस विरोध केला होता. महामंडळाच्या साध्या बसेसच्या तुलनेत शिवशाही बसेसच्या अपघातांची संख्या जास्त असून त्याला खासगी चालक हे एक कारण असल्याचे बोलले जात आहे. विशेषत: घाट रस्त्यांवर या बसेसच्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. पुणे येथील कात्रज घाटात शिवशाही बसचा नुकताच अपघात होऊन दोघांना जीव गमवावा लागला होता. या बसेस दिसायला आकर्षक असल्या तरी तांत्रिकदृष्ट्या दुय्यम दर्जाच्या असल्याची चर्चा आहे. महामंडळाच्या अन्य बसेसच्या तुलनेत शिवशाही बसेसचे वाढते अपघात, ही चिंतेची बाब आहे.