लोकप्रतिनिधींनी लक्ष्य देण्याची मागणी ; विद्यार्थ्यांना करावी लागतेय कसरत
वाठार – कारखाना ते खुबी दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे आणि पावसाच्या पाण्यामुळे झालेली चिखलाची रबडी यामुळे प्रवाशांची जीवघेणी तारेवरची कसरत सुरु आहे. या रस्त्याने प्रवास करताना जीव मेटाकुटीला येत असून लोकप्रतिनिधींनी त्वरित लक्ष्य घालून हा रस्ता दुरुस्तीसाठी कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.
कराड तालुक्याचे शेवटचे टोक असणारे खुबी हे गाव कराड पासून 22 किलोमीटर अंतरावरती आहे. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे. या गावातील बहुतांशी लोकांचा या ना त्या निमित्ताने दैनंदिन व्यवहार कारखाना परिसराशी निगडित असतो.
गावातील नोकरदार मंडळी तसेच शाळकरी मुले दुचाकी या सायकलवरून या रस्त्याने ये-जा करतात. गत काही वर्षांपासून या रस्त्याची दुरावस्था सुरु आहे. संबंधित विभाग तसेच लोकप्रतिनिधीचे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवली आहे.
गत आठवड्यात झालेल्या पावसामुळे या रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साठून रस्त्यावर चिखलाची रबडी तयार झाली आहे. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे. कारखान्यावरती शाळेला सायकलवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची या रस्त्याने येताना त्रेधातिरपीट उडत असते. या नादुरुस्त रस्त्यामुळे येथे अनेक अपघात झालेले आहेत. सध्या रस्त्यावरील खड्डे आणि चिखलामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. तरी लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती करावी. अशी मागणी होत आहे.
कारखाना ते खुबी दरम्यानच्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून शाळकरी विद्यार्थी व नोकरदार मंडळींना या रस्त्यावरील प्रवासाचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी ठोस उपाययोजना करावी.
सुहास पाटील खुबी