पुणे – भोर तालुक्यातील एका खेड्यातून 2011 मध्ये सुरू झालेल्या फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचा प्रवास हे विचार चळवळीचे मोठे यश आहे. तीन महापुरुषांच्या विचारांचा वारसा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी सुरूवात केली. नऊ वर्षांपूर्वीचा हा प्रवास लोकल ते ग्लोबल झाला आहे. भोरसारख्या दुर्गम तालुक्यातून सुरू झालेला हा प्रवास जागतिक स्तरावर पोहोचला आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील ही विचारपताका प्रत्यक्षात कृतीतून खऱ्या अर्थाने लोकलपासून ग्लोबल झाली आहे. या मंडळाचा आतापर्यंतच्या यशस्वी वाटचालीचा प्रवास…
भोरला ऐतिहासिक विचारांची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचे ऐतिहासिक लेणं या भूमीने कायम आपल्या अंगाखांद्यावर अभिमानाने मिरवलेलं आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभला भोरला लाभला आहे. भोरपासून हाकेच्या अंतरावर असलेले “खानवडी’ हे महात्मा जोतीराव फुले यांचे गाव. खंडाळा तालुक्यातील “नायगाव’ हे राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची कर्मभूमी कोल्हापूरनगरी, असा वैचारिक वारसा भोर तालुक्याला लाभला आहे. वैचारिकतेचे उत्तरदायित्व स्वीकारून काही समविचारी मंडळींनी एकत्र येत फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळाची स्थापन केली. अल्पावधीतच त्याचा “लोकल ते ग्लोबल’ असा प्रवास विचारमंथन आणि जागृती करणारा ठरला आहे.
फुले-शाहू-आंबेडकर यांची मर्यादित ओळख तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे मंडळाने ठरविले. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी तालुक्यातील सर्व समाजबांधव आणि समविचारी संस्था, संघटनांना एकत्रित बोलाविले. त्यानंतर फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलनाची संकल्पना पुढे आली. 2015 मध्ये पहिले फुले-शाहू- आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन संपन्न झाले. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, पत्रकार उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या संमेलनाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ निर्माता, दिग्दर्शक नागराज मंजुळे उपस्थित होते, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तीन माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले आणि डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या उपस्थितीने हे संमेलन ऐतिहासिक ठरले.
भोरमधील अनेक सामाजिक संस्था, संघटना उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. पुरोगामी विचारांचे वाहक आणि वारसदार बनले ते भोरचे प्रभावी नेतृत्व, आमदार संग्रामदादा थोपटे. हा विचारवारसा ते नेटाने पुढे चालवत आहेत. अनंतराव थोपटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख हे विचारांनी आणि कर्तृत्वाने संमेलनाची शान वाढवत आहोत. कॉ. ज्ञानोबा घोणे, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. अरुण बरांडे, डॉ. सुरेश गोरेगावकर, धनंजय कोठावळे, पत्रकार भुजंगराव दाभाडे, हसीना शेख आदी कार्यकर्त्यांची फौज महत्त्वाची भूमिका पार पाडत आहोत. आबा शिंदे, प्रा. रवींद्र भालेराव, आनंदा गायकवाड, भालचंद्र सोरटे, सुनंदा गायकवाड, निलेश घोडेस्वार, प्रफुल्ल बनसोडे, विकास जाधव, आनंदा जाधव, मनिष यादव, सागर कांबळे, सुजाता भालेराव, संजय गायकवाड आदी कृतीशिल मंडळी आहेत. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या मानवतावादी विचार आणि वैश्विक समतेची मूल्य जोपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी मंडळाने राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यगौरव पुरस्कारांची घोषणा केली. महाराष्ट्रातल्या अनेक पुरस्कारामध्ये याची गणना केली जाते.
महाराष्ट्रातील वैचारिक व्यक्तिमत्त्व उत्तम कांबळे यांच्या विचारमंथनातून संविधान साक्षरतेची मोहीम राबविण्याचा मंडळाने संकल्प केला. संविधानाबाबत जागृतीसाठी प्रायोगिक तत्त्वावर भोर तालुक्यातील “लव्हेरी’ हे गाव निवडले. साडेतीनशे ते चारशे लोकवस्ती असलेले हे गाव भाटघर धरणाच्या कुशीत वसलेले आहे. संविधान म्हणजे काय? येथूनच सुरुवात करावी लागली. अभ्यासक प्रा. सुभाष वारे यांची व्याख्याने, बार्टीच्या माध्यमातून संविधानाच्या प्रती वाटप, न्यायाधीश, वकील यांच्या माध्यमातून संविधान परिसंवाद घेतले. आरोग्य तपासणी व मार्गदर्शनाचे कॅम्प घेऊन गावकऱ्यांमध्ये जागृती घडवून आणली. शेतकरी, गृहिणी, विद्यार्थी, विद्यार्थिनी संविधानाबाबत मते मांडू लागले त्यामुळे लव्हेरी- 100 टक्के संविधान साक्षर झाले आहे. पुढील टप्प्यात संपूर्ण भोर तालुका 100 टक्के संविधान साक्षर करण्याचा संकल्प आहे. जानेवारी 2021 पासून मोहिमेला आम्ही प्रारंभ करीत आहोत. एका ग्रामीण भागात सुरू झालेल्या मंडळाने जागतिक पातळीपर्यंत मजल मारावी हे एक अनोखे काव्य आहे. फुले-शाहू-आंबेडकरांचा विचारवारसा पुढे घेऊन जाताना आपण सर्वजण यात सामील होऊ आणि विचारप्रवाहाचा अधिक विस्तार करू!.
आणखी चार देशांमध्ये संमेलनाचे नियोजन:
गोवा, कर्नाटक आदी ठिकाणांहूनही निमंत्रण
मंडळाने अलीकडच्या काळात महामानव यांचा जयंती उत्सव “डीजे’ विरहीत करण्यासाठी विचारांचा महोत्सव भरवण्याचे सकारात्मक पाऊल टाकले आहे. विचारमहोत्सव भरवण्यासाठीची गोवा आणि कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात येथूनही निमंत्रणे आली आहेत. मंडळाने नियोजन केले आहे. फुले-शाहू-आंबेडकरांचा विचाराची नव्याने ओळख जगाला व्हायला हवी, असा मानस होता. “मॉरीशस’ सरकारच्या मराठी स्पिकिंग युनियनकडून आंतरराष्ट्रीय फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसार संमेलन मॉरीशसमध्ये घेण्याचे निमंत्रण आले. “लोकल संस्था आता “ग्लोबल’ झाली आहे.
डॉ. रोहिदास जाधव- अध्यक्ष, अशोक (आबा) शिंदे- कार्याध्यक्ष, प्रा. रवींद्र भालेराव- सचिव, आनंदा गायकवाड- उपाध्यक्ष, भालचंद्र सोरटे- कोषाध्यक्ष, सुनंदा गायकवाड- सदस्य, सुजाता भालेराव- सदस्या, विकास जिजाबा जाधव- सदस्य, आनंदा आ. जाधव- सदस्य, निलेश अशोक घोडेस्वार- सदस्य, विशाल जीवन सावंत- सदस्य, सागर दिलीप कांबळे- सदस्य, जगन्नाथ आनंदा गायकवाड- सदस्य, अशोक धोंडीराम गोरे- सदस्य, अविनाश संपत गायकवाड- सदस्य. कार्यकारिणी
शब्दांकन- डॉ. रोहिदास जाधव, भोर.
संकलन- भुजंगराव दाभाडे.