नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी राहिल्याचा मुद्दा राजकीयदृष्ट्या तापला आहे. तो मुद्दा गुरूवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित झाला. त्याशिवाय, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून कडक पाऊल उचलले जाण्याची शक्यता असल्याचे संकेतही मिळू लागले आहेत.
मोदींच्या उपस्थितीत येथे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यामध्ये अनेक मंत्र्यांनी कॉंग्रेसशासित पंजाबमधील घडामोडीबाबत चिंता व्यक्त केली. याआधी कधीच पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत तडजोड होण्याचा प्रकार घडला नाही. त्यामुळे पुन्हा तसे प्रकार घडू नयेत यासाठी जरब बसवणारे पाऊल उचलले जावे, अशी मागणी मंत्र्यांनी केल्याचे समजते.
सुरक्षाविषयक त्रुटीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारमध्ये उच्च स्तरावर चर्चा सुरू आहे. पंजाबमधील घडामोडीची तपशीलवार माहिती केंद्रीय गृह मंत्रालय गोळा करत आहे, असे उच्चस्तरीय सुत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे कारवाईचे पाऊल उचलण्याच्या तयारीत केंद्र सरकार असल्याचे चित्र तूर्त तरी पुढे आले आहे.