मुंबई – सिंचन सुविधामुळेच शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त होतो. त्यामुळेच काळेश्वरमसारख्या प्रकल्पांची आणि त्यासाठी राज्यांच्या परस्पर सहकार्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन तेलंगणातील महत्त्वाकांक्षी अशा काळेश्वरम सिंचन प्रकल्पाच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भावना व्यक्त केल्या.
तेलंगणा राज्यातील काळेश्वरम सिंचन प्रकल्पाच्या उद्घाटनाचे निमंत्रण स्वीकारतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी राव यांच्या दूरदृष्टीचे आणि या प्रकल्पपुर्तीच्या वेगाचेही कौतुक केले. ते म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी केंद्रीत आहे. त्यामुळे कृषी सिंचन सुविधेच्या क्षमतेतूनह भारतीय अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळते. त्यामुळे महाराष्ट्रातही आम्ही सिंचन सुविधांच्या बळकटीकरणावर भर दिला आहे.
त्याचसाठी मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी महत्त्वाकांक्षी योजनेला वेग देण्याचा प्रयत्न आहे. समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी नदीत आणल्यामुळे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात सिंचनासाठी पाणी मिळणार आहे. या ग्रीडमध्ये अकरा धरणांना जोडण्यात येणार आहे. यामुळे वारंवार अवर्षणाला तोंड देणाऱ्या या भागाला मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्पांसाठी राज्या-राज्यातील पाणी वाटपाबाबत संवाद वाढीस लागणेही गरजेचे आहे. त्यादृष्टीने काळेश्वरम हा प्रकल्प देशासाठी एक उत्तम उदाहरण ठरेल, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
हा प्रकल्प महाराष्ट्राच्या सहकार्याशिवाय पूर्ण होणे शक्य नव्हते. अनेक बाबतीत आपल्याकडून मिळालेल्या सहकार्यामुळेच हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला. या प्रकल्पासाठी महाराष्ट्राने केलेले सहकार्य तेलंगणाची जनता कधीही विसरणार नाही. हा प्रकल्प पुढील अनेक पिढ्यांसाठी त्यांच्या भविष्याला आकार देणारा ठरणार आहे. त्यामुळे या पिढ्याही महाराष्ट्राप्रती कृतज्ञच राहतील, असे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव म्हणाले. याप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, तेलंगणाच्या मंत्रिमंडळातील सदस्य आदी उपस्थित होते.