दुबई – आयपीएल स्पर्धेत आज बलाढ्य मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात महत्त्वपूर्ण सामना होत आहे. या सामन्यात विजय मिळवत स्पर्धेत पाचवे विजेतेपद साकार करण्यासाठी रोहित शर्मा आणि कंपनी तर, पहिल्याच विजेतेपदासाठी श्रेयस अय्यर सज्ज झाले आहेत.
यंदाच्या स्पर्धेत रोहितच्या नेतृत्वाखालील मुंबईने 14 सामने खेळताना 9 विजयांची नोंद केली. त्यांना 5 सामने गमवावे लागले असले तरीही त्यांनी गुणतालिकेत पहिले स्थान मिळवताना थाटात अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे सुरुवातीचे काही सामने जिंकत गुणतालिकेत अग्रस्थान मिळालेल्या दिल्लीला नंतरचे सामने गमावल्याने प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवणेही कठीण बनले होते. मात्र, त्यांनी सातत्याने सरस कामगिरी करत अखेर अंतिम फेरी गाठली.
रविवारी झालेल्या क्वॉलिफायरच्या सामन्यात त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला व या फेरीत प्रवेश करताना विजेतेपदासाठीही दावेदारी सिद्ध केली. अर्थात त्यांना या फेरीत बलाढ्य मुंबईचा सामना करावा लागणार आहे.
मुंबईने फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रात अफलातून कामगिरी केली आहे. त्यांच्या फलंदाजीला आठव्या क्रमांकापर्यंत खोली आहे. तसेच जसप्रीत बुमराह व ट्रेन्ट बोल्ट यांनी पहिल्या स्पेलमध्येच समोरच्या संघातील बलाढ्य फलंदाजंना तंबूत पाठवले आहे. इतकेच नाही तर त्यांनी डेथ ओव्हर्समध्येही आपली अचूकता सिद्ध करताना सर्व संघांना या पाच षटकांत 8 पेक्षा जास्त सरासरीने धावा करू दिलेल्या नाहीत. त्यातही बोल्टचे स्विंग चेंडू तर बुमराहचे यॉर्कर दिल्लीच्या फलंदाजांसाठी धोका ठरणार आहेत.
इशान किशन, कर्णधार रोहित शर्मा, कॅरन पोलार्ड, कॉन्टन डीकॉक, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या व सौरभ तिवारी अशी भक्कम फलंदाजी त्यांच्याकडे आहे. त्यांच्या गोलंदाजीतही विविधता आहे. बुमराह, बोल्ट यांच्यासह कृणाल पंड्या, नाथन कुल्टरनाईल, राहुल चहर, पोलार्ड यांनीही यंदाच्या स्पर्धेत सातत्याने सरस कामगिरी केली आहे.
नाणेफेक महत्त्वाची ठरणार…
या मैदानावरील खेळपट्टी कायमच फलंदाजांसाठी नंदनवन ठरलेली आहे. त्यामुळे याही सामन्यात मोठी धावसंख्या उभारली जाण्याची शक्यता आहे. मुंबईनेही क्वॉलिफयरच्या पहिल्या सामन्यात दिल्लीविरुद्धच द्विशतकी धावसंख्या उभारली होती. त्यामुळे मुंबईचे पॉवर हिटर्स या सामन्यातही मोठी धावसंख्या उभारून दिल्लीवर दडपण राखण्याचा प्रयत्न करेल. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न राहणार आहे त्यामुळे नाणेफेकच या सामन्यातही महत्त्वाची ठरणार आहे.
दिल्लीबाबत बोलायचे झाले तर कर्णधार श्रेयस अय्यर, शिखर धवन, मार्कस स्टोनिस व शेमरन हेटमायर या चारच फलंदाजांवर त्यांची फलंदाजी अवलंबून आहे. सुमार कामगिरीमुळे पृथ्वी शॉ याला संघातील स्थान गमवावे लागत असून आजच्या सामवन्यातही त्याला संधी मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. गोलंदाजीतही त्यांच्याकडे फारसे पर्याय नाहीत.
कागिसो रबाडा व अनरिच नोर्जे या वेगवान गोलंदाजांनी जरी बळी घेतले असले तरीही त्यांच्या कामगिरीत सातत्याचा अभावही दिसून आला आहे. फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विन यानेही सातत्यपूर्ण कामगिरी केली असली तरीही त्याला धावा रोखण्यात यश आलेले नाही.
अक्सर पटेल व मार्कस स्टोनिस यांनीही उपयुक्त गोलंदाजी केली आहे. मात्र, त्यांची गोलंदाजीची मदार रबाडा याच्यावरच राहणार आहे. त्यातही मुंबईच्या पहिल्या पाच पॉवर हिटर्सला रोखण्यासाठी त्यांना आपल्या क्षमतेपेक्षाही जास्त सरस खेळ करावा लागणार आहे.