मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थोडा शांत झालेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढले आहे. मुंबईत १० ऑगस्टपर्यंत सतर्कतेचा इशारा दिला आहे. या कालावधीत मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान आज पुणे आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
आज पुणे आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर पुण्यात गेल्या २४ तासांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच येत्या तीन ते चार दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांत विदर्भातही मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. पूर्व विदर्भातील नागपूरमध्ये ८८.० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर चंद्रपूरमध्ये ७७.५ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर पश्चिम विदर्भातील अमरावतीत २२.० मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राप्रमाणेच कोकणातही पावसाने जोर धरला आहे. रत्नागिरी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तर दिवसभर पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या २४ तासांत कोकणात १५.६ ते ६४.४ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, येत्या पाच दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. तसेच नदी काठच्या गावांना सावध राहण्याचा इशाराही हवामान विभागाच्यावतीने देण्यात आला आहे.