यावर्षीचा पावसाळी हंगाम सरासरीपेक्षा जास्त चांगला राहणार असून मान्सूनची सुरुवात भारतात दहा दिवस आधीच होईल, अशा प्रकारचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केल्याने जरी सर्वत्र आनंदाचे वातावरण असले, तरी गेल्या काही दिवसांमध्ये देशाच्या विविध भागांना जी उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवरच या आनंदाच्या बातमीचे स्वागत करावे लागणार आहे.
मान्सून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारतात दाखल होणार असला, तरी एप्रिल महिन्यामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात उष्णतेचा त्रास सहन केला आहे ते पाहता नजीकच्या कालावधीमध्ये निसर्गाने “सावध ऐका पुढल्या हाका’, असा संदेशच दिला आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या आकडेवारीप्रमाणे मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये ज्या उष्णतेच्या लाटा आल्या तशा प्रकारची तीव्र उष्णता गेल्या 122 वर्षांत जाणवली नव्हती आणि हा उन्हाळी हंगाम संपायला आणखी काही दिवसांचा कालावधी बाकी असल्याने येत्या काही दिवसांमध्ये यापेक्षाही जास्त तीव्र उन्हाचा त्रास सहन करावा लागणार आहे.
भारतातील अनेक शहरांमध्ये तापमानाने 45 अंश सेल्सिअस पातळी गाठली आहे. अनेक शहरांमध्ये 40 अंश सेल्सिअस ही सर्वसाधारण पातळी ठरली आहे. एकीकडे उन्हाची तीव्रता अशी वाढत असतानाच महाराष्ट्रासारख्या राज्यात अनेक शहरांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. बाष्पीभवनाची तीव्रता वाढली आहे, त्यामुळे धरणातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. तीव्र बाष्पीभवनामुळे नद्यांतील पाणीही आटत चालले आहे. पाण्याची अशी परिस्थिती असताना दुसरीकडे विजेची टंचाई जाणवू लागली आहे. उन्हाळी हंगामातच मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर केला जातो आणि विजेची मागणीही जास्त प्रमाणात वाढते; पण आता कोळशाची टंचाईसुद्धा जाणवत आहे आणि धरणांमधील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यामुळे जलविद्युत निर्मिती कमी होऊ लागली आहे. निसर्गावर अवलंबून असलेली सामाजिक व्यवस्था एक प्रकारे या दुष्टचक्रात सापडली आहे. मोठ्या महानगरांमध्ये आणि इतरत्रही मोठ्या प्रमाणावर कॉंक्रिटची जंगले उभी राहत असल्याने व विकासाच्या नावाखाली मोठमोठी बांधकामे केली जात असल्याने त्याचा फटका आता हळूहळू बसू लागला आहे.
जागतिक संघटनेने केलेल्या संशोधनाप्रमाणे आगामी कालावधीत उष्णतेची तीव्रता आणखीनच वाढणार असून ती लोकांच्या सहनशक्तीच्या मर्यादेच्या बाहेर जाण्याचा धोका आहे. उन्हातानात राबणाऱ्या शेतकऱ्यालाही शेतात जाऊन काम करणे शक्य होणार नाही. त्याचा विपरीत परिणाम शेती उत्पादनावरही होणार आहे. हवामान खाते दरवर्षी ठराविक कालावधीनंतर उष्णतेच्या लाटेचे अंदाज व्यक्त करीत असते. गेल्या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येने हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचे अंदाज व्यक्त केले तेवढे अंदाज गेल्या शंभर वर्षांतही व्यक्त करण्यात आले नव्हते. या अंदाजाप्रमाणे ठिकठिकाणी उष्णतेच्या लाटा अनुभवास आल्या. भारतामध्ये यावर्षी जेवढ्या तीव्र प्रमाणात उष्णता जाणवत आहे ती पाहता हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे की काय, अशी शंका आता हवामान तज्ज्ञांनाही येऊ लागली आहे.
भारतात या वर्षी उष्णतेच्या लाटेमुळे आणि उष्माघातामुळे बळी पडलेल्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. वनखात्याने दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या काही महिन्यांमध्ये भारतातील विविध ठिकाणी वणवे लागण्याचे प्रमाणही वाढले आहे. मोठा वणवा लागला की शेकडो झाडे त्या वणव्यात जळून खाक होतात. एखादे झाड संपूर्णपणे वाढण्यासाठी दहा-पंधरा वर्षे लागत असतील तर दहा पंधरा मिनिटांच्या वणव्यामध्ये शेकडो झाडांची राख होते. त्याचा फटका नंतरच्या कालावधीमध्ये बसणे क्रमप्राप्त ठरते. यावर्षी थंडीचा मोसमही अतिशय तीव्र होता. गेल्या वर्षीचा पावसाळी हंगामही त्याच प्रमाणात तीव्र होता आणि या वर्षीचा उन्हाळी हंगाम संपल्यानंतर जो पावसाचा हंगाम सुरू होणार आहे तो सुद्धा अशाच प्रकारचा तीव्र असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हे पाहता मानवाच्या हस्तक्षेपामुळे निसर्गाचे चक्र बदलले आहे ते पुन्हा जर मार्गावर आणायचे असेल तर सावधपणे पावले टाकावी लागतील, असा संदेश निसर्गाने दिला आहे.
पावसाळी हंगामही तेवढ्याच तीव्र स्वरूपात समोर आला, तर दीर्घकाळ दैनंदिन व्यवहार विस्कळीत होण्याचा धोका निर्माण होणार आहे. अनेक अनावश्यक विषयांना समोर आणून विनाकारण राजकीय कुरघोड्या करणाऱ्या राजकीय पक्षांनी आता ग्लोबल वॉर्मिंगच्या या महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. राजकीय नेत्यांच्या कार्यालयांमध्ये आणि घरात जरी वातानुकूलित यंत्रणा असली तरी सर्वसामान्य नागरिकाला मात्र उन्हाच्या तीव्र झळा सोसण्याशिवाय पर्याय नाही. ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेतील एका शहराचे अस्तित्व नुकतेच संपल्याची घटना ताजी आहे. एकीकडे पाणी टंचाई, दुसरीकडे वीज टंचाई आणि तिसरीकडे उन्हाच्या लाटा अशा दुष्टचक्रात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकाने जगावे कसे, असा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर विद्यमान राज्यकर्त्यांकडे नसेल.
निसर्गाने दिलेल्या या हाका आतापासूनच ऐकून जर काही उपाययोजना अमलात आणली तरच आगामी कालावधीमधील परिस्थिती सुधारण्याची आशा आहे. ज्या प्रमाणात झाडे तोडली जात आहेत तेवढ्या प्रमाणात ती लावली तर लगेच त्यांचा फायदा होणार नसला, तरी आगामी पिढीचा विचार करता चिरंतन विकासाच्या तत्त्वावर विश्वास ठेवूनच आता पावले टाकावी लागणार आहेत. सर्व प्रकारचे ऋतू अतिशय तीव्र करून निसर्गाने जी हाक दिली आहे त्या हाकेला ओ देण्याची जबाबदारी जेवढी सरकारची आहे तेवढीच ती सर्वसामान्य नागरिकांची पण आहे, हे या ठिकाणी विसरून चालणार नाही.