नगर – विधानसभा निवडणुकीत बारा शून्यचा नारा देणाऱ्या माजीमंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. सुजय विखे यांनी भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला असल्याचा थेट आरोप करून भाजपच्या पराभूतांसह विद्यमान आमदारांनी आजच्या भाजपच्या राज्यस्तरीय बैठकीत उदाहरण व पुराव्यानिशी आपल्या व्यथा मांडल्या.
यावेळी विखे पिता-पुत्रांनी हे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर जिल्ह्यातील पाडापाडीची तटस्थ समितीमार्फत चौकशी करण्यात येईल, त्यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर पक्ष योग्य ती कारवाई करेल, असे आश्वासन दिले.
आज मुंबईत ना. फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षाची राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विद्यमान आमदारांच्या पराभवांवर चर्चा झाली.
त्यावेळी पक्षाचे संघटन मंत्री विजय पुराणिक, किशोर काळकर, माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, माजीमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार वैभव पिचड, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीचा पराभव प्रा. शिंदे यांना चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे प्रा. शिंदे यांनी या पराभवला विखेंच कारणी भूत असून ते पक्षात आल्यानंतर पक्षाला त्याचा काही फायदा झाला नाही. उलट पक्षाचे 5 आमदार असतांना पिचड व विखे पक्षात आल्याने पक्षाचे 7 आमदार झाले होते. परंतु विखेंनी राजकीय समिकरणे बदलून टाकली आहे. आता पक्षाचे तीन आमदार राहिले आहे.
यावेळी प्रा. शिंदे यांच्याप्रमाणेच उर्वरित सर्व पराभूतांसह विद्यमान आमदारांनी विखेंच्या विरोधात आपल्या तक्रारीचा पाढा वाचला. विशेष म्हणजे तालुकानिहाय असलेली स्थिती व त्यात विखेंकडून विरोधकांना झालेली मदत यांचे उदाहरणासह पुरावे यावेळी देण्यात आले.
त्यामुळे पक्षातील संघर्ष यावेळी फडणवीस यांच्यासमोर चव्हाट्यावर आला.
यावेळी विखे पिता-पुत्रांनी करण्यात आलेले आरोपांचे खंडण करण्याचा प्रयत्न केला. सर्व पराभूतांसह विद्यमान आमदारांचे मुद्दे त्यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला. ना. फडणवीस यांनी या बैठकीत दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर या पाडापाडीची तटस्थ समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. संघटनमंत्री विजय पुराणिक यांना ही चौकशी करून अहवाल देण्याचे सांगण्यात आले. हा अहवाल आल्यानंतर दोषीवर योग्य ती कारवाई पक्षाकडून करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष बेरड यांनी पक्षांतर्गत असे संघर्षमय वातावरण संघटनेला घात असून त्यात सुधारणार करण्याची विनंती केली. यावेळी प्रा. शिंदे व कर्डिले यांनी आक्रमकपणे विखेंच्या विरोधात मुद्दे मांडले.