वृद्ध महिलेसह कुटुंब चाळीस वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत
मेणवली – पाचगणीमधील गोडवली गावातील दलित समाजातील वृद्ध महिलेच्या कुटुंबातील दोन पिढ्यांवर गेली चाळीस वर्षांपासून जाणीवपूर्वक व हेतुपुरस्सर अन्याय करणाऱ्या गाव टग्यांच्या जुलमी अत्याचारामुळे पीडित वृद्ध महिलेसह तिच्या संपूर्ण कुटुंबावर जन्मभूमी सोडून जाण्याची वेळ आली आहे. गोडवली येथील शोभा बबन कांबळे ही वृद्ध महिला गेली चाळीस वर्षांपासून गावटग्यांचा अत्यंत भयावह त्रास सहन करत असून 1933 पासून आजपर्यंत वहिवाटीत असलेल्या जमिनीत तिच्या डोळ्यादेखत घूसखोरी सहन करावी लागत आहे. आजपर्यंत या टग्यांनी वृद्ध महिलेला विविध प्रकारे मानसिक त्रास देऊन गावातून पळवून व हाकलून लावण्याचा आतोनात प्रयत्न केला असल्याचे महिलेकडून बोलले जात आहे.
दोन पिढ्याच्या वहिवाटी जमिनीच्या ताली पाडणे, शेतातील उभी पिके जबरदस्तीने काढून नेणे, पिकांची नासधूस करून बांधावरील झाडाची कत्तल करून दिवसा ढवळ्या मोकळ्या जागेत मुद्दाम बांधकाम करून अतिक्रमण करत जागा बाळकांवून मनमानी करणे, घरासमोर घाण, कचरा आणून टाकणे अशा विविध प्रकारे मानसिक त्रास देऊन प्रसंगी धमकावणे, दमदाटीने कांबळे कुटुंबाला गाव सोडून जाण्याची भाषा वापरली जात आहे.
याबाबत न्यायासाठी गोडवली ग्रामस्थ, तंटामुक्ति कमिटी, तहसीलदार, सातारा जिल्हाधिकारी, पाचगणी पोलीस यांच्याकडे वारंवार लेखी व तोंडी मदतीची याचना केली व करत आहे परंतु संबंधित टग्यांवरील राजकीय वरदहस्तामुळे या गंभीर घटनेची आजवर कुणीही दखल घेतली नाही. प्रशासनाने पीडित महिलेची चाळीस वर्षांपासूनची सुरू असलेली ससेहोलपट व अवहेलना लक्षात घेऊन गोडवली गाव टग्यांची तत्काळ चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी वृद्ध महिलेकडून केली जात आहे.