मुंबई: लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल होत असल्याने अनेक व्यवसाय, उद्योगधंदे पुन्हा सुरु झाले आहेत. यामुळे आपल्या घरी परतलेले बिहार, उत्तर प्रदेशातील परप्रांतीय मजूर पुन्हा महाराष्ट्रात परतण्यास सुरुवात झाली आहे. पायी तसेच श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून गेलेले अनेक मजूर, कामगार रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या संख्येने पुन्हा महाराष्ट्रात परतत आहेत.
यामुळे अनेक ट्रेनचे बुकिंग पुढील काही दिवसांसाठी फूल आहे. यामध्ये मुंबई, पुण्यात परतणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
लॉकडाऊनमध्ये रोजगार बंद झाल्यानंतर अडकलेल्या कामगार, मजुरांसाठी 1 मे पासून श्रमिक ट्रेन सुरु करण्यात आल्या होत्या. या ट्रेनमधून हजारो कामगार आपापल्या घरी गेले होते.
यानंतर श्रमिक गाड्या वगळता रेल्वेकडून 1 जूनपासून देशभरातून विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या. श्रमिक रेल्वे केवळ एकाच दिशेने सोडण्यात आल्या. मात्र, या विशेष गाड्या दैनंदिन पद्धतीने दोन्ही बाजूने सुरू करण्यात आल्या.