पुणे – मार्केट यार्डात सुरू होऊन दोन आठवडे झाले असून, शेतीमालाची आवक आता वाढू लागली आहे. त्याबरोबरच ग्राहकांची संख्याही वाढू लागली आहे. भाजीपाल्यामध्ये गेल्या रविवारच्या तुलनेत 10 ट्रक जास्त शेतीमालाची आवक झाली. फळभाज्यांमध्ये आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने टोमॅटो, सिमला मिरची, शेवगा, घेवडा, तोतापुरी कैरीच्या भावात सुमारे 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची आवक वाढली असून, परिणामी, घाऊक बाजारात जुडीमागे 5 रुपयांनी घसरण झाली आहे. शेपूच्या भावातही जुडीमागे 3 रुपयांनी घट झाली आहे. आवक घटल्याने मेथीच्या भावात जुडीमागे अनुक्रमे 4 रुपये, तर अंबाडी, राजगिरा आणि चुकाच्या भावात प्रती जुडी 2 रुपयांनी वाढ झाली आहे. उर्वरित पालेभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याचे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले.
पराराज्यातून येथील बाजारात हिमाचल प्रदेश येथून 2 ट्रक मटार, इंदौर येथून 2 टेम्पो गाजर, गुजरात, मध्यप्रदेश येथून लसूण 7 ते 8 ट्रक, गुजरात आणि कर्नाटक येथून 3 ते 4 ट्रक कोबी, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात येथून 7 ते 8 टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून 2 टेम्पो घेवडा तसेच 2 टेम्पो तोतापुरी कैरीची आवक झाली. तर, पुणे विभागातून सातारी आले 500 ते 600 पोती, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 3 ते 4 टेम्पो, फ्लॉवर 3 ते 4 टेम्पो, ढोबळी मिरची 3 ते 4 टेम्पो, तांबडा भोपळा 7 ते 8 टेम्पो, भुईमुग 50 ते 60 पोती, कांदा 30 ते 35 टेम्पो आणि आग्रा, इंदौर येथून सुमारे 22 ट्रक बटाट्याची आवक झाली.