जम्मू -भारतीय लष्कराने बुधवारी जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव उधळून लावला. त्यावेळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या एका गटाने नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून भारतीय हद्दीत शिरकाव केला. ते दहशतवादी राजौरी जिल्ह्यात 400 मीटर भारतीय हद्दीत घुसले. सतर्क भारतीय जवानांनी त्यांना आव्हान दिले.
त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये एक दहशतवादी ठार झाला. भारतीय जवानांच्या पवित्र्यामुळे घाबरलेल्या इतर दहशतवाद्यांनी माघारी पाकिस्तानी हद्दीत पलायन केल्याचा अंदाज आहे. तसे असले तरी चकमकस्थळी पाकिस्तानी दहशतवादी दडले नसल्याची खातरजमा करण्यासाठी भारतीय जवानांची मोहीम बराच काळ सुरू होती. ठार झालेल्या दहशतवाद्याकडील एके-47 रायफल जप्त करण्यात आली.