चीनकडून 40 हजार कोटींची निर्यात थांबवली
पुणे – दिवाळी सण तोंडावर आला आहे. यासाठी लागणाऱ्या छोट्या वस्तुंच्या उत्पादनामध्ये चीनने केलेले आक्रमण थोपविण्यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)तर्फे राष्ट्रीय स्तरावर “भारतीय सामान-हमारा अभिमान’ राबवून चीनकडून होणारी 40 हजार कोटींची आयात थांबवण्यात यश मिळाले आहे. चीनच्या आक्रमक वृत्तीला बहिष्काराचे अस्त्र वापरून आर्थिक दणका दिल्याची माहिती “कॅट’चे राष्ट्रीय संघटनमंत्री ललित गांधी यांनी दिली.
कॉन्फेडरेशनच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी समितीचे कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र बाठीया, अध्यक्ष दिलीप कुंभोजकर, उपाध्यक्ष पुष्पा कटारिया, संजय फडतरे, संयुक्त मंत्री सचिन निवंगुणे, रायकुमार नहार, सूर्यकांत पाठक, उमेश यादव, विजय नेवळा, चंद्रशेखर बुणीया, मनोज सारडा, गिरीष ओसवाल आदी उपस्थित होते.
भारतातील सात कोटी व्यापाऱ्यांची तसेच कुटिरोद्योग, लघुउद्योग यांच्या 4 लाख संघटनांची शिखर संस्था म्हणून कार्यरत असलेल्या “कॅट’ने भारतीय उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी देशभर राबवत असलेल्या अभियानाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
गांधी म्हणाले, भारत दरवर्षी चीनकडून सुमारे 5 लाख कोटी रुपयांची आयात करतो. ज्या वस्तूंना स्थानिक स्तरावर सहज पर्याय उपलब्ध आहेत. अशा वस्तूंची आयात, तसेच स्थानिक स्तरावर विक्री थांबवून, स्थानिक स्तरावरील उत्पादकांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारून कॉन्फेडरेशनतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी राष्ट्रीय स्तरावर “भारतीय सामान-हमारा अभिमान’ हा उपक्रम राबविला जात आहे.
दीपावलीनिमित मोठ्या प्रमाणात वापर होणारी उत्पादने, लाईटच्या माळा, आकाश कंदील, पणत्या आदी वस्तू चीनमधून आयात केल्या जात होत्या. त्याला फाटा देऊन स्थानिक स्तरावर या वस्तूंच्या उत्पादकांना प्रोत्साहित करण्यात आले.
“कॅट’तर्फे भारत-ई-मार्केटची निर्मिती
देशात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून ई-कॉमर्स क्षेत्रात विस्तार केला आहे. त्याचा फटका भारतीय व्यापाऱ्यांना बसत आहे. ई-कॉमर्सच्या माध्यमातून छोट्या व्यापाऱ्यांसमोर निर्माण झालेल्या या आव्हानाला तोंड देण्यासाठी “कॅट’ने भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या सहकार्याने “भारत-ई-मार्केट’ नावाचे संपूर्ण स्वदेशी पोर्टल विकसित केले आहे. हे ऑनलाइन पोर्टल पूर्णपणे भारतीय व्यापाऱ्यांच्या मालकीचे असणार आहे. येत्या डिसेंबरमध्ये या पोर्टलचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होणार आहे. पहिल्या टप्यात 1 कोटी व्यापाऱ्यांची नोंदणी या पोर्टलच्या माध्यमातून केली जाणार असल्याचेही ललित गांधी यांनी सांगितले.