मुंबई – इंग्लंडविरुद्ध गेल्या वर्षी स्थगित झालेली एक कसोटी खेळण्यासाठी भारतीय संघ पुढील महिन्यात रवाना होणार आहे. या कसोटी मालिकेत भारतीय संघाने 2-1 अशी आघाडी घेतली असून पाचवा कसोटी सामना आता खेळवला जाणार आहे. त्यासाठी नियमित कर्णधार रोहित शर्माने कसून सरावाला प्रारंभ केला आहे.
जुलै महिन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेतील उर्वरित एक कसोटी सामना खेळणार आहे. यंदाच्या मार्चमध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर आता जुलैमध्ये कसोटी सामना खेळणार आहे.
गेल्या वर्षी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा सामना आहे. त्यावेळी इंग्लंडमध्ये करोनाचा धोका वाढल्यामुळे हा सामना स्थगित करण्यात आला होता.
इतिहास रचण्याची संधी
येत्या 1 ते 5 जुलै दरम्यान इंग्लंडविरुद्धची ही पाचवी कसोटी होणार आहे. भारतीय संघ या मालिकेत 2-1 असा आघाडीवर आहे. भारताला 2007 सालानंतर प्रथमच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी मिळाली आहे. या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध 3 एकदिवसीय तसेच 3 टी-20 सामन्यांची मालिकाही खेळणार आहे.
यंदाची आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर रोहित प्रथमच सरावासाठी मैदानात उतरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेमधून त्याने व विराट कोहलीसह काही प्रमुख खेळाडूंनी विश्रांती घेतली आहे. ही मालिका येत्या गुरुवारपासून 19 जूनपर्यंत खेळली जाणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध दोन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.