-अमित डोंगरे
तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात भारतीय संघाने यश मिळवले असले तरी त्यामागे क्रिकेटिंग ब्रेन बदली कर्णधार अजिंक्य रहाणेचा होता हे सांगूनही कोणाला खरे वाटणार नाही. सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यासारखे स्टारडम रहाणेकडे नाही मात्र, त्याच्याकडे अत्यंत उच्च दर्जाचा क्रिकेटिंग ब्रेन आहे व हेच त्याने या सामन्यात दाखवून दिले.
रविवारच्या 2 बाद 98 वरुन सोमवारी पुढे खेळ सुरु झाल्यावर रहाणे लगेचच बाद झाला पण त्याने संघात डाव्या-उजव्या फलंदाजांचे गणित करुन बलाढ्य ऑस्ट्रेलियालाच गोंधळात टाकले. त्याची ही खेळी अत्यंत धूर्त होती व त्यामुळे यजमान संघाचे गोलंदाज संभ्रमात अडकले. ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी जवळपास 8 दशके जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजवत आहे. सध्याच्या संघाच्या गोलंदाजीचा दर्जा लिली-थॉम्पसन किंवा वॉर्न-मॅकग्रा यांच्या तोडीचा नसल्यानेच रहाणेच्या योजनेला त्यांच्याकडे उत्तरच नव्हते.
खेळपट्टीवर उजव्या हाताने फलंदाजी करणारे फलंदाज असतील किंवा दोन्ही फलंदाज डावखुरे असतील तर गोलंदाजांना गोलंदाजी करणे सोपे ठरते. मात्र, एकाच वेळी डावा-उजवा फलंदाज खेळपट्टीवर असेल तर मात्र, दिशा, टप्पा यांत सातत्य राखणे कठीण ठरते. त्यांच्या संघातील अननुभवी गोलंदाजी पाहूनच रहाणेने स्वतः बाद झाल्यावर ऋषभ पंतला चेतेश्वर पुजारासह फलंदाजीला पाठवले व डावे-उजवे गणित राखले. पुजारा बाद झाल्यानंतरही त्याने इंजेक्शन घेऊन फलंदाजीला उतरण्याच्या तयारीत असलेल्या डावखुऱ्या रवींद्र जडेजाच्या जागी हनमा विहारीला फलंदाजीला पाठवून पुन्हा एकदा डावे-उजवे गणित कायम राहील याची काळजी घेतली. इथेच यजमान संघाच्या गोलंदाजांसमोर संभ्रम निर्माण झाला.
या सामन्यात ऋषभ पंत वेगळाच भासला. त्याने फलंदाजीत मिळालेल्या बढतीच्या संधीचे सोने केले. त्याने पुजाराच्या बरोबर विरुद्ध पद्धतीने आक्रमक फलंदाजी केली. त्याचे शतक जरी पूर्ण होऊ शकले नसले तरीही त्याने आपल्यावरील टीकेला सडेतोड उत्तर देत सामना भारत हरणार नाही याची खात्री निर्माण केली. पुजारानेही दोनशेपेक्षा जास्त चेंडू खेळताना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांमध्ये नैराश्य निर्माण केले. पुजाराविरुद्ध एकूण तीनवेळा पायचीतचे अपिल करण्यात आले.
त्यावेळी एकदा पॅट कमिन्सने तर दोनवेळा नाथन लॉयनने केलेले अपिल पाहिले तर ते पंचांकडे याचनाच करत असल्याचा भास झाला इतके ते हवालदील बनले होते. याच पुजाराला नाबाद देण्याच्या पहिल्या डावातील निर्णयावर पंचांनाच उद्देशून अपशब्द वापरणारा त्यांचा कर्णधार टीम पेनीही आता काय केले म्हणजे भारतीय फलंदाज बाद होतील या विचारात होता. त्याने त्यांचे पारंपरिक स्लेजिंगचे अस्त्रही काढून पाहिले पण सत्ताधारी विरोधकांना कवडीचीही किंमत देत नाही त्याचप्रमाणे भारतीय फलंदाजांनीही यजमानांचा चहापानाचा कार्यक्रम नाकारला. प्रत्यक्ष मैदानावर फलंदाजी पुजारा, पंत, विहारी यांची फलंदाजी जितकी महत्त्वाची होती, तितकीच रवीचंद्रन अश्विनची खेळीही मोलाची ठरली. त्याने विहारीसह जवळपास अडीचशे पेक्षा जास्त चेंडूंचा सामना केला व सामना वाचवण्यात आपला मोलाचा वाटा उचलला.
या फलंदाजांनी केलेल्या कामगिरीची चर्चा पुढील काही वर्षे होत राहील यात शंका नाही. अश्विन सोडला तर हे अन्य पुजारा व विहारी हे दोन्ही फलंदाज द वॉल राहुल द्रविडचे शिष्य. त्यामुळे तंत्रशुद्ध फलंदाजीचे बाळकडू त्यांना मिळालेले असल्याने संपूर्ण दिवस कसा खेळून काढायचा हेच त्यांनी यजमान संघाला शिकवले.
अर्थात, मैदानावर जरी ते फलंदाजी करत असले तरीही त्यामागे तल्लख मेंदू रहाणेचाच होता यात शंका नाही. त्याच्याकडे अन्य तीन कर्णधारांसारखे स्टारडम नाही पण मुंबईची अत्यंत खडूस क्रिकेटवृत्ती असल्याने कोणत्याही परिस्थितीत अखेरचा चेंडू पडेपर्यंत हार मानायची नाही हे त्याने दाखवून दिले. ऍडलेड कसोटी गमावल्यानंतर मेलबर्न कसोटीत संघाचा विजय साकार करताना त्याने भर मैदानावर आपल्या खेळीचे दर्शन घडवले.
या सामन्यातही त्याने आपल्या तैलबुद्धीच्या जोरावर यजमानांना नामोहरम केले. आता चौथा व निर्णायक सामना चार दिवसांनी होत असून त्यात विजय मिळवत दोन वर्षांपूर्वीच्या मालिका विजयाची पुनरावृत्ती रहाणेच्या संघाने करावी हीच अपेक्षा आहे.