कोलंबो – एकदिवसीय मालिकेतील विजयानंतर शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत विजेतेपदाकडे वाटचाल सुरू केली आहे.
भारतीय संघाने रविवारी झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यातील विजयासह या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून मंगळवारी होत असलेल्या दुसऱ्या सामन्यासह ही मालिकाही जिंकण्यासाठी धवनसेना सज्ज बनली आहे.
पहिल्या सामन्यात प्रमुख फलंदाजांना अपयश आल्यानंरही सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेसमोर मोठे आव्हान ठेवले. चांगल्या सुरुवातीनंतरही भुवनेश्वर कुमारच्या अचूक गोलंदाजीसमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली व भारताने हा सामना 38 धावांनी जिंकत मालिकेत आघाडी घेतली. आता दुसरा सामना जिंकून मालिकाही खिशात टाकण्याची संधी धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला मिळाली आहे.
या दौऱ्यावर आलेल्या संघाने राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणात एकदिवसीय मालिका जिंकली व आता टी-20 मालिकाही जिंकून वर्चस्व राखण्याची संधी आहे. एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघात सहा बदल करण्यात आले व नवोदितांना संधी देण्यात आली होती.
तसेच या मालिकेतही आता दुसरा सामना जिंकून मालिका सुरक्षित करत तिसऱ्या सामन्यासाठी संघात बदल होणार की याच सामन्यात सेकंडबेंचला खेळवले जाणार हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.