नवी दिल्ली – चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी भारतीय नौदलाने हिंद महासागरात आपली गस्त आणि तैनाती वाढवली आहे. त्याशिवाय, मित्रदेशांसमवेत युद्धाभ्यास करून चीनला योग्य तो संदेश देण्याची रणनीतीही भारतीय नौदलाने अवलंबली आहे.
मागील काही काळापासून पूर्व लडाख विभागात चिनी कुरापती वाढल्या आहेत. त्यातून सीमेलगत म्हणजेच प्रत्यक्ष ताबा रेषेच्या (एलएसी) लगत दोन्ही देशांत सात आठवड्यांपासून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे एलएसी लगत भारतीय सशस्त्र दलांनी आपली तैनाती आणखी मजबूत केली आहे. अशातच भारतीय नौदल पुढे सरसावले आहे.
चिनी नौदलाकडून दक्षिण चीन समुद्रात आणि हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात आक्रमक हालचाली केल्या जात आहेत. त्यावर वचक ठेवण्यासाठी भारतीय नौदलाकडूनही ठोस पावले उचलली जात आहेत. चिनी प्रभाव वाढू नये यासाठी भारताबरोबरच अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सच्या नौदलांनी परस्पर सहकार्य वाढवले आहे. त्याचाच भाग म्हणून शनिवारी भारत आणि जपानच्या नौदलांनी हिंद महासागरात संयुक्त कवायती केल्या. त्यामध्ये दोन्ही देशांच्या प्रत्येकी दोन युद्धनौका सहभागी झाल्या. चिनी कुरापतींच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाला याआधीच अलर्ट पातळी वाढवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
भारतीय हद्दीत 423 मीटर आतपर्यंत चीनची घुसखोरी
लडाखच्या गलवान खोऱ्यातील भारतीय हद्दीत चीनने घुसखोरी केल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने उपग्रहावरून घेतलेल्या छायाचित्रांच्या आधारे केला आहे. चीनने भारतीय हद्दीत 423 मीटर आतपर्यंत शिरकाव केला आहे. त्या भागात चीनने 16 तंबू आणि एका मोठ्या छावणीची उभारणी केली आहे. त्याशिवाय, छायाचित्रात चीनची 14 वाहने दिसतात, असे संबंधित वृत्तात नमूद करण्यात आले आहे.