नवी दिल्ली – केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने तब्बल आठ वर्षांनंतर अखेर भारतीय तिरंदाजी संघटनेला (एएआय) मान्यता दिली आहे. तसेच तिरंदाजी संघटनेचा समावेश राष्ट्रीय क्रीडा महासंघामध्येही (एनएसएफ) करण्यात आला आहे.
एएआयच्या नवीन पदाधिकाऱ्यांची या वर्षांच्या सुरुवातीला म्हणजेच 18 जानेवारीला निवडणूक झाली होती. मात्र, क्रीडा मंत्रालयाची संघटनेला मान्यता नसल्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या पदांवर शिक्कामोर्तब करण्यात आले नव्हते. मात्र, आता अधिकृत मान्यता मिळाल्याने अर्जुन मुंडा अध्यक्षपदी, तसेच प्रमोद चांदूरकर (महासचिव) आणि राजेंद्र सिंग तोमार (खजिनदार) यांची निवड ग्राह्य धरण्यात आली आहे.
राष्ट्रीय क्रीडा आचारसंहितेनुसार उपाध्यक्ष आणि संयुक्त सचिव यांच्या नियुक्त्या झाल्या नसल्याने क्रीडा मंत्रालयाने त्यांना मान्यता दिलेली नाही. त्यासाठी नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश एएआयला देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे नियमांचे पालन करण्यात आले नाही तर पुन्हा ही मान्यता काढून घेण्यात येईल, असेही क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.