संगमनेर – संगमनेर अशांत कसे करता येईल, याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात दंगे जाणीवपूर्वक घडवले जातात. संगमनेरच्या समनापूरमध्ये जो प्रकार घडला तो जाणीवपूर्वक घडवला गेला, हे पूर्व नियोजित होते. कोणतरी असे करण्यासाठी सुचवत आहे. हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे वक्तव्य आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.
मंगळवारी संगमनेर शहरात सकल हिंदू समाजाचा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा संपल्यानंतर मोर्चेकरी घरी जात असताना समनापूर गावात दोन गटांत दगडफेक होऊन वातावरण चिघळले होते.
या घटनेला दोन दिवस उलटले असले तरी दोन समाजांत मोठा तेढ निर्माण झाला होता. आतापर्यंत पोलिसांनी 17 जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करून दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली.आमदार थोरात म्हणाले की, सत्तेत जाण्यासाठी धर्माचा मार्ग सांगितला जातो, हे दुर्दैवी आहे. कर्नाटकच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उठाव दिसत आहे. महाराष्ट्रात घटनाही घडत आहेत, त्यामुळे हे दुर्दैवी आहे.
ज्याची क्षमता, त्याला निवडणुकीचे तिकीट
राज्यात लोकसभेच्या जागा वाटपाबाबत बोलताना आ.थोरात यांनी सांगितले, आम्ही महाविकास आघाडीचे तिघे ही नेते एकत्र बसतो. ज्याची क्षमता तेथे आहे त्याला तिथे तिकीट देत गेलो. राज्यात 48 पैकी 40 जागा महाविकास आघाडीच्या येतील. जनता सध्याच्या कारभाराला वैतागलेली असल्याचेही त्यांनी सांगितले.