बारामती (प्रतिनिधी) – कोल्हापूरमध्ये जे काही घडलं ते महाराष्ट्राच्या लौकिकतेला शोभणार नाही. राज्यातील सर्वसामान्य जनतेला आणि विशेषता या ठिकाणी प्रकार घडले त्या ठिकाणच्या जनतेला आव्हान आहे की, महाराष्ट्र प्रिय राज्य आहे. या सगळ्या सर्वसामान्य लोकांना कायदा हातात घेण्यासंबंधीची प्रवृत्ती नाही. कुणीतरी काहीतरी करून जाणीवपूर्वक वादविवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल त्यांनाही माझा आक्षेप आहे. याची किंमत सामान्य माणसाला द्यावी लागते. सामान्य माणसाच्या हितासाठी सामंजस्याची व सहकार्याची भूमिका घेणे महत्त्वाचे असल्याचे मत शरद पवार यांनी बारामती येथे व्यक्त केले.
बारामती येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, शासकीय यंत्रणेला सर्वसामान्य लोकांनी मनापासून सहकार्य द्यायची गरज आहे. सहकार्य दिलं तर ही अवस्था तातडीने बंद झालेली दिसून येईल. कोल्हापूर शहर असो इतर शहर असो या सगळ्या शहरांचा सामाजिक परिवर्तनाचा ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे. अशी पार्श्वभूमी असेल तर त्या ठिकाणी शांतता निर्माण झाली पाहिजे.
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामान्य माणसांच्या हिताची जपणूक केली पाहिजे. माझी खात्री आहे जर कोण चुकीचे वागत असेल तर बहुसंख्य समाजाने संयमाची भूमिका घेतल्यानंतर राज्य सरकारने त्याच्यामध्ये सामंजस्याची भूमिका घेतल्यानंतर त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित होईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांना योजना जाहीर होतात कृती होत नाही
शेतकऱ्यांना अनेक योजना जाहीर केले मात्र त्याची कृती दिसून येत नाही .मी काल विदर्भातील एका जिल्ह्यात गेलो होतो. त्या सगळ्या ठिकाणी मला एक गोष्ट ऐकायला मिळाली अतिवृष्टी आणि गारपीट यांनी जे नुकसान झाले त्यासाठी जी मदत जाहीर झाली ती मदत अद्याप मिळाली नाही. ही गोष्ट चांगली नाही. त्यांच्या अडचणीच्या काळात या बळीराजाला शासनाने मदत केली पाहिजे. हा त्यांचा आग्रह आहे. तो काही चुकीचा नाही याला सहकार्य करणे हा प्रयत्न माझ्यासारखे लोक सुद्धा करतील असे शरद पवार महाले.
मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
दुधाचे दर घसरण्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, यापूर्वी देखील असा प्रकार झाला होता. या निर्णयाच्या पाठीमागे जवळपास पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय ठराविक काळासाठी घेतला होता. आज आवश्यकता तीच आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय केला जातो. दुसरी गोष्ट अशी जिथे जिरायत शेती आहे त्याची जिराईत शेतीमध्ये आज दुधाचा व्यवसाय अनेकांचे संसार चालवतो. दुधाची किंमत इतकी घसरलेली आहे. त्यामुळे या सामान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने अजिबात योग्य नाही. म्हणून मी स्वतः येत्या दहा पंधरा दिवसात राज्य सरकारची विचारविनिमय करणार असून त्यांना विनंती करणार असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा आणि या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे पवार म्हणाले.