नवी दिल्ली – करोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतातील विविध क्षेत्राच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे कर्ज वसुलीवर काही प्रमाणात परिणाम होऊन बॅंकांची अनुत्पादक मालमत्ता थोडीफार वाढू शकते असे मुडीज या पतमानांकन संस्थेने जाहीर केलेल्या अभ्यास अहवालात म्हटले आहे.
मात्र परिस्थिती फारच चिंताजनक होणार नाही, असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. दुसऱ्या लाटेमुळे बऱ्याच व्यक्ती आणि कंपन्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला असल्यामुळे कर्ज वसुलीवर थोडाफार परिणाम होऊ शकतो. मात्र बॅंकांनी वेळीच उपाययोजना केल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही असेही या संस्थेने म्हटले आहे.
आता अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर येत आहे. त्याचबरोबर रिझर्व बॅंक आणि केंद्र सरकार उद्योगांना काही प्रमाणात मदत करत आहेत. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही नाही. मात्र अशा परिस्थितीतही खासगी क्षेत्राने कर्ज घेऊन विस्तारीकरण करण्याची गरज वाढली आहे.
त्यासाठी अर्थमंत्रालय पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे. कालचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बॅंकांना सध्याच्या परिस्थितीमध्ये कर्जाची वाढ व्हावी यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यासाठी ऑक्टोबरपासून बॅंका कर्ज वितरणाची मोहीम हाती घेण्याची शक्यता आहे. रिझर्व बॅंकेने काही उद्योगांना कर्जाची फेररचना करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे अनुत्पादक मालमत्ता हाताबाहेर जाणार नाही असे या संस्थेला वाटते.