नवी दिल्ली – देशाचे आरोग्यमंत्री हर्ष वर्धन आणि दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी करोना महासाथीबाबत केलेल्या वक्तव्यावर इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्षेप नोंदवला आहे. या दोन्ही नेत्यांनी करोना महासाथीचा अंत नजीक आला असल्याचं वक्तव्य केलं होत. यानंतर आयएमएने याबाबत जाहीर केलेल्या वक्तव्यामध्ये राजकीय नेतेमंडळी व सरकारला लोकांमध्ये ‘सुरक्षिततेची खोटी भावना’ निर्माण करण्यावरून सावधगिरीचा इशारा दिला आहे.
“राजकीय वर्तुळामध्ये करोना परिस्थितीबाबत सुरु असलेले दावे-प्रतिदावे दुःखद आहेत, मात्र या दाव्यांची सत्यता जागतिक आरोग्य संघटना व आयएमएसारख्या विज्ञानाधारित संस्थांच पडताळू शकतात.” असं देखील आयएमएच्या वक्तव्यामध्ये म्हंटलंय.
यावेळी, करोना महासाथीचा सामना करताना मृत पावलेल्या ७४० फ्रंट लाईन वर्कर्सची आठवण करून देत आयएमएने नागरिकांनी, मास्क घालणे व सामाजिक अंतर राखणे यांसारख्या नियमांचे पालन करायला हवे असं देखील सूचित केलंय.
आयएमएने आपल्या वक्तव्यामध्ये राजकीय नेत्यांच्या करोनाबाबतच्या दाव्यांचा ‘अनधिकृत’ असा उल्लेख करताना, “गत सप्ताहामध्ये राज्यातील बाधितांची संख्या ३५ ते ४० टक्के इतकी वाढली असल्याचं आकडे सांगतात. राजधानी दिल्लीमध्ये देखील रोज सापडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण १०० वरून १४० इतके वाढले आहे. यामुळे आपण करोना महासाथीबाबत बढाया मारायला नको.” असा आरसा दाखवला आहे.
तत्पूर्वी, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी शनिवारी देशातील करोना परिस्थितीबाबत भाष्य करताना, ‘देशातील करोना महासाथीचा अंत नजीक आहे’ असं म्हंटलं होत. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी देखील दिल्लीतील करोना महासाथ शेवटच्या घटका मोजत असल्याचे वक्तव्य केले होते. याच पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने याबाबत भूमिका मांडताना नाराजी व्यक्त केली.