जयपूर येथे सापडलेले उद्योगपती गौतम पाषाणकर यांचा पत्रकार परिषदेत दावा
पुणे – उद्योगपती गौतम पाषाणकर यांचा 32 दिवसानंतर पुणे पोलिसांनी छडा लावत त्यांना बुधवारी जयपूर येथून विमानाने पुण्यात आणले. चौकशीनंतर पत्रकार परिषदेस त्यांनी हजेरी लावली. यावेळी पाषाणकर यांनी या प्रवासाचा उलगडा केला. कुटुंबाचा विचार आल्याने आत्महत्येच्या विचारापासून मतपरिवर्तन झाल्याचे सांगितले. मात्र, घरी परतण्याचा विचार केला नव्हता असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले, उपनिरीक्षक संजय गायकवाड आणि कपिल पाषाणकर उपस्थित होते. पाषाणकर यांनी दि.21 ऑक्टोबर रोजी वाहन चालकाकडे सुसाइड नोट देऊन घर सोडले. यानंतर पोलिसांची सहा पथके त्यांच्या मागावर होती. त्यांचे एका राजकीय व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय मुलाने व्यक्त केला.
यामुळे या घटनेला वेगळे वळण लागले होते. मात्र, पाषाणकर सुरक्षित असल्याचे पोलीस सांगत होते. पाषाणकर यांचे कोल्हापूर येथील एका हॉटेलच्या सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांना मिळाले. त्यांच्याकडे मोबाइल नसल्याने तसेच त्यांनी क्रेडिट व डेबिट कार्डचा वापर केला नसल्याने तांत्रिक तपास थांबला होता. मात्र पाषाणकर जयपूरला असल्याचे मंगळवारी तांत्रिक तपासात उघड झाले.
पैसे मागणाऱ्यांचे बोलणे मनाला लागले…
या 32 दिवसांच्या प्रवासाबद्दल बोलताना गौतम पाषाणकर यांनी सांगितले, “गेल्या काही महिन्यांत व्यवसायातील उलाढाल थांबली होती. यामुळे मानसिक कोंडी झाली. ती सुधारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातून बाहेर पडू न शकल्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला. स्वारगेट येथे रिक्षाने आल्यावर बसने कोल्हापूर गाठले. गाठीशी 80 हजारांची रोकड होती.
कोल्हापूरहून कोईम्बतूर, बंगळुरू, तिरुपती, कन्याकुमारी, जैसलमेर असा प्रवास करत जयपूरला पोहचलो. बुधवारी जयपूर सोडून निघणार होता. मात्र, पोलिसांनी आदल्याच दिवशी मला गाठले. या कालावधीत कुटुंबाशी संपर्क केला नाही. पण, जेव्हा किरकोळ रकमेसाठी आपण पैसे देणे असणारा मनाला लागेल असे बोलतो, तेव्हा ते खूपच वाईट वाटते. ही सलच बोचल्याने घर सोडले होते.’