योगायोगाने, टप्प्याटप्प्याने घरातील कर्त्या पुरुषांचे मृत्यू होतात आणि तिघी-चौघी विधवांच्या गोतावळ्यात नव्याने विवाह होऊन एक नववधू येऊन पडते. नवऱ्याची इच्छा नसताना बळजबरीने झालेला हा विवाह तिला सासरी आल्यावरच ठाऊक होतो. तरुण विधवांच्या अपूर्ण राहिलेल्या सुप्त इच्छांच्या त्रासातून नववधूचा सुरू झालेला जाच आणि या साऱ्यावर सोशिकतेने मात करून वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी ही नववधू म्हणजेच कल्याणी होय.
कादंबरीचा नायक वासुदेव कमालीचा शिवभक्त-देवभक्त आहे. तो निष्ठेने, श्रद्धेने आणि नेमाने घरातल्या शंकराच्या पिंडीवर अभिषेक आणि बिल्वपत्रे वाहात असतो. कादंबरीच्या प्रारंभीच त्याचे काका आप्पा त्याला लग्नासाठी आग्रह करताना दिसतात आणि तो पूजा करीत असतो. त्याला विवाह करावयाचा नसतो. घरातील कोणाचाच विवाह आजवर यशस्वी झालेला नाही किंबहुना दोघांपैकी कोणीतरी एक मृत्युमुखी पडले आहे, असे त्याला नेहमी वाटते. त्यामुळे त्याच्या स्वत:च्या विवाहाने त्याच्या जीवास धोका निर्माण होईल की काय, अशीच शंका तो आप्पाकाकांकडे व्यक्त करतो. अर्थात, त्याची भीती वृथा नसते. घरातील घटनांवरून ते खरे वाटते.
घरात सावित्रीकाकू आहेत. पदरात तीन पोरं टाकून त्यांचा नवरा म्हणजे वासुदेवाचे काका गेले आहेत.
मुकुंदा, महादेव आणि मंदा ही ती तीन पोरं. आप्पाकाकांचा एकुलता एक मुलगा विनायक क्षयाने गेलेला. त्याची बायको इंदिरा बकाबका खाणारी, पदरी पोर न देता नवरा गेल्याने कायम त्याच विचारात असणारी. घरात एक पोक्त महिला म्हणजे आंधळी आनंदीआत्या. तिचेही यजमान गेलेले. आप्पांची कोवळी पोर काशी कालपरवा सासरहून परतलेली, अंगावरचे सौभाग्यलेणे उतरवण्याचे दुर्भाग्य तिच्या नशिबी. शिवाय आप्पांची पत्नी सीताही गेलेली. वासुदेवाचे आई-वडील गेलेले. जणू काही या घराण्याला मृत्यूचा शापच लाभलेला असावा, असं वाटण्याइतपत परिस्थिती आणि त्याचाच वासुदेवाने धसका घेतलेला असतो.
अखेरीस काका आणि आत्याच्या हट्टापुढे वासुदेव मान तुकवतो पण आत्याला शब्द देताना तो म्हणतो, “”सवाष्णच हवी आहे ना तुला… करतो लग्न. आत्या, तुला सून मिळेल, पण तिला कोणी मिळणार नाही.” या वाक्यात अर्थाऐवजी अनर्थ भरलेला असतो. थोडक्यात, वासुदेव होणाऱ्या पत्नीचा सर्वार्थाने स्वीकार करणार नसल्याचे सूचित होते आणि ही दुर्दैवी पत्नी होणार असते कल्याणी!
वासुदेवाचे घराणे इनामदारांचे! श्रीमंत! मंदोर या मारवाड प्रातांत हे कुटुंब पिढ्यान्पिढ्या येऊन वसलेले. पूर्वेकडून उत्तरेपर्यंतचा लांबचलांब प्रवास करून कल्याणी आपल्या मामांसोबत मंदोर स्टेशनवर उतरते आणि टांग्यात बसून आठवले कुटुंबाच्या घरी पोहोचते. आठवल्यांकडून तिला कळते, आपला होणारा नवरा मोठा देवभक्त आहे. ते ऐकून ती मनोमन त्याला वरते. सायंकाळी मोजक्या अलंकारांनी नटलेली कल्याणी इनामदारांच्या वाड्यात पाऊल टाकते तेव्हा तिच्या अंगावर गोड झिणझिण्या उठतात. आप्पासाहेब पाहुण्यांचं स्वागत करतात. “ये बाळ’ अशी स्नेहभरली आत्याच्या तोंडची हाक ऐकून कल्याणीला क्षणभर आईच आहे की काय असे वाटते. मुलाला मुलगी दाखवण्याच्या कार्यक्रम होतो, पण वासुदेव तिच्याकडे बघतही नाही.
अर्थात तरीही लग्न ठरते. मामा घरी पत्र पाठवतात. कल्याणीच्या माहेरी गरिबी असते. आई रमाबाई पांगळ्या असतात. इकडे थाटामाटाने विवाहसोहळा सपन्न होतो. रात्री वासुदेव त्यांच्याकडील विश्वासू नोकर दामूला कल्याणीच्या मृत सासूच्या देवकीच्या अर्थात राणीमॉंच्या खोलीत कल्याणीचे अंथरूण टाकण्यास सांगतो. आत्याला हा खूप मोठा धक्का असतो. आत्या वासुदेववर संतापते आणि वासुदेव नाईलाजाने कल्याणीला आपल्या खोलीत झोपण्याची परवानगी देतो. मात्र, रात्री त्यांचे मिलन होत नाही. वासुदेव तिला आपल्या घरात एकही सवाष्ण नाही हे सांगतो. शिवाय आपल्या घराण्याला तो शाप आहे असेही सांगतो, पण यावर कल्याणी विश्वास ठेवायला तयार होत नाही. वासुदेवाचे एक महत्त्वाचे वाक्य लेखिका पुढीलप्रमाणे लिहिते, “हे बघ, नीट ऐक आमच्या घरात एकही सवाष्ण नाही. या वाड्यात भरल्या कपाळाने कोणीच बाई राहू शकत नाही. कल्याणी, माझा जीव जर तुला जगवायचा असेल तर सवाष्ण होण्याचा प्रयत्न करू नकोस. म्हणजे तू सवाष्ण राहशील.’
कल्याणीवर हा खूप मोठा आघात असतो. मनातील आनंदोर्मी थुई थुई नाचण्याच्या आधीच खुडल्या जातात. कल्याणीपुढे जणू जन्माचे कोडे पडते. दुसऱ्या दिवशी शेजारपाजारच्या स्त्रिया तिची चेष्टा करतात; पण कल्याणी कोमजलेली असते. तिची चुलत नणंद काशीला कल्याणीशी बोलावेसे वाटते. एखाद-दोन वर्षांनी मोठी असलेली काशी वैधव्याचं दु:ख सोशीत असते. तिला कल्याणीचा हेवा वाटतो पण कल्याणीला ती कधी दुखवित नाही. तुलनेने सावित्रीकाकू आणि इंदिरावहिनी मात्र तिचा पहिल्या दिवसापासून दु:स्वास करावयास लागतात. कल्याणी आणि वासुदेवाची जोडी त्यांच्या डोळ्यात सलू लागते. इनामदारांच्या कुंकवाची कल्याणी लौकिक अर्थाने धनीण असते पण प्रत्यक्षात वासुदेवाने तिचा स्वीकार केलेला नसल्याने तिचं मन सतत आक्रंदत असतं.
नव्या सूनबाईकडे पाहून आप्पा सुखावतात. त्यांना त्यांच्या पत्नीची सीताची आठवण येते. एकांतात ते सीतेला मंगला म्हणत. मंगला म्हणजे मांगल्य असे त्यांना वाटते. श्रीमंता घरची मंगला आप्पांना अर्ध्यावर सोडून निघून जाते. नंतर विनायक जातो. इंदिरेपेक्षा नवी सून हजारपटीने चांगली असल्याचे त्यांना जाणवते.
कोणी बोलू नये, नावे ठेवू नये म्हणून कल्याणी आता सगळ्यांच्या आधी उठायला लागते. आंघोळ करून वासुदेवाच्या पूजेची तयारी करणे आता तिच्या सवयीचे होते. नवऱ्यापासून दूर असलेली कल्याणी नवऱ्यावर जीवापाड प्रेम करू लागते. घरातल्या पोरांशी कल्याणीचे चांगले मेतकूट जमते. मंदाचे केस विंचरून देण्यापासून तिचे लाड करण्यापर्यंत कल्याणी सारे करते, पण मंदाला अगं तुगं केलेलं सावित्री सासूबाईंना आवडत नाही. त्या कल्याणीला लागेल असे बोलतात पण आत्याबाई कल्याणीची बाजू घेतात. सावित्री आक्रसाळेपणा करतात.
हळूहळू घरातल्या कपाळकरंट्या बाया कल्याणीचा कमालीचा द्वेष करायला लागतात. मुख्यत्वे सावित्री आणि इंदिरा तर जास्तच. घरातला नोकर दामू कल्याणीला सतीपूजनासाठी घेऊन जाताना कल्याणीच्या सासूची कहाणी सांगतो. घराण्याचे मुख्य पुरुष वासुदेवाचे आजोबा दादासाहेब मोठे कर्तबगार. पण त्यांची बायको म्हणजे त्राटिकेचा अवतार. नवऱ्यावर प्रेम करणे त्यांना ठाऊकच नव्हते. त्यात थोरले चिरंजीव म्हणजे वासुदेवाचे वडील तमाशातल्या बाईच्या नादाला लागतात. त्यावेळी हे कुटुंब महाराष्ट्रात असते पण आपल्या लाडक्या मुलाच्या कल्याणासाठी मारवाडात निघून येते. वाळवंटात हा वाडा उभा होतो.
दादासाहेब थोरल्या लेकराला इथल्या राजवाड्यात प्रवेश मिळवून देतात. तेथे त्यांना राजाच्या मुलांसोबत शिकारीचा नाद लागतो. धाकटे चिरंजीव आप्पासाहेब हुशार त्याहून धाकटे नानासाहेब अशक्त. थोरले धनी मराठी शिकण्यासाठी हटून बसतात तेव्हा कोकणातून दामूच्या थोरल्या भावाला रावजीला बोलावून घेतले जाते. “वासुदेवावर तुम्ही आईची माया करा’, असे दामू कल्याणीला विनवतो.
वासुदेवाच्या आईलाही पतीचे खरे प्रेम मिळालेले नसते. राजघराण्याच्या आश्रीतांकडच्या त्या असतात. वासुदेवाच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांना देता येईल तेवढा त्रास दिलेला असतो. कारण त्यांना रेश्मा या नाचणारीणीशी लग्न करावयाचे असते. देवकीबाईंशी झालेला विवाह ही एक तडजोड असते. हा विवाह थोरल्या आईसाहेबांनाही रुचत नाही. एकंदरीत इनामदार घराण्याच्या इतिहासात दु:खाच्या राशीच उभ्या असतात. कल्याणी या साऱ्यांतून हळूवारपणे वाटचाल करीत असते. त्यात चुलत दीर मुकुंदा कल्याणीकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतो. पण कल्याणीच्या लक्षात आल्यावर ती त्याला चांगलेच दटावते. तेव्हापासून तोही कल्याणीचा द्वेष करू लागतो.
इंदिरावहिनी कल्याणीला त्रास होईल असे वागत राहतात, पण कल्याणीच्या मनात मात्र इंदिरेविषयी करुणाच वाटत असते.
आपली बायको खूप सुंदर आहे आणि अत्यंत शालीन आदबशीर आणि दुसऱ्याविषयी चांगुलपणा असणारी आहे, याची खात्री हळूहळू वासुदेवाला पटू लागते आणि तो हळूवारपणे तिच्यात गुंतू लागतो. एके दिवशी रात्री तीन वाजता त्याला जाग येते, तेव्हा कल्याणी बिछान्यावर नसते. तो तिचा शोध घेतो तेव्हा अंघोळ करून शुचिर्भूत होऊन कल्याणी देवपूजा करीत असल्याचे दृश्य त्याच्या नजरेस पडते आणि कल्याणी आपल्यापेक्षाही मोठी आहे याची खात्री त्याला पटते.
सातआठ महिने होतात आणि कल्याणीला माहेरी पाठविण्यात येते. सोबत काशी आणि दामू असतो. दामू दोन दिवसांनी परतणार असतो पण तेथे तो आजारी पडतो. त्याच्या जीवाची आशा सारे सोडतात. आपल्या घरचा अत्यंत विश्वासू नोकर म्हणून कल्याणी त्याच्यासाठी सोळा सोमवाराचे व्रत करण्याचे ठरवते आणि दामूच्या तब्येतीस उतार पडतो. कल्याणीच्या मामेभावाला यशवंताला विधवा काशी आवडते. तो तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करतो, हे घरात आप्पा सोडल्यास कोणालाच आवडत नाही पण कल्याणी मात्र पुढाकार घेऊन हे लग्न लावून देते. लग्नसोहळा संपल्यावर कल्याणी सासरी परतते तेव्हा वासुदेवाच्या नाराजीला तिला तोंड द्यावे लागते. आत्याही नाराज असतात. दामूही सगळ्यांच्या दोषास पात्र ठरतो. त्याच्यासाठी धरलेले सोळा सोमवार कुचेष्ठेचा विषय होतो. वासुदेव कल्याणीला खूप बोलतो. ती ऐकते मात्र सगळी कर्तव्ये करीत राहते.
ताठ मानेने तिचे वावरणे हळूहळू वासुदेवाला आवडू लागते. या सगळ्यात वासुदेव आणि कल्याणीत नवराबायकोचे अजूनही संबंध नाहीत हे लक्षात आल्यावर सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. यथावकाश कल्याणी काशीचे बाळंतपण करते. दरम्यान, मुकुंदा घरातून दागिने घेऊन फरार होतो पण ते दागिने योगायोगाने रावजीला मिळतात आणि तो ते घेऊन येतो व कल्याणीला देतो. काही दिवसांनी मुकुंदा घरी परततो. काही कालावधीनंतर त्या दागिन्यांचा विषय काही कार्यक्रमाच्या निमित्ताने निघतो तेव्हा दागिने सापडत नाही कारण ते कल्याणीकडे असतात. कल्याणी ते आपल्या पेटीतून काढून देते पण त्यातून मोठा अनर्थ निर्माण होतो. अर्थात सगळ्याचा खुलासा पुढे होऊन कल्याणीचे निर्दोषत्व समोर येते.
कल्याणीच्या उदार अंत:करणाचा सगळ्यांना वेगवेगळ्या प्रसंगात अनुभव येतो. तिचे शुद्ध चारित्र्य, नितळ प्रेम आणि घराण्याच्या नावासाठी काहीही करण्याची तयारी यातून सगळे तिला मनपासून मानू लागतात. आत्याबाईही तिला जवळ घेतात आणि वासुदेवही सर्वार्थाने तिचा स्वीकार करतो. अशा सुखान्ताने कादंबरी संपते.
डॉ. विनोद गोरवाडकर