नवी दिल्ली – आयसीसीने विश्वकरंडक स्पर्धांसह विविध स्पर्धांचा आराखडा तयार करताना येत्या काळात जास्तीत जास्त देशांच्या संघांना संधी देण्याचे निश्चित केले आहे. जर स्पर्धेला विश्वकरंडक असे संबोधले जात असेल तर त्यात जास्त संघ सहभागी झाले पाहिजेत, असे आयसीसीने आपल्या पत्रकात म्हटले आहे.
नव्या आराखड्यानुसार टी-20 विश्वकरंडक स्पर्धा दर दोन वर्षांनी खेळवली जाणार आहे, तर 50 षटकांची विश्वकरंडक स्पर्धादेखील नव्या आराखड्यासह 2027 सालापासून खेळवली जाणार असून, त्यात 14 संघांना प्रवेश देण्याचा विचार सुरू आहे.तसेच कसोटी अजिंक्यपद स्पर्धादेखील नव्या रचनेनुसार आणखी काही संघांना स्थान देऊन खेळवण्यावर भर देण्याचाही विचार सुरू आहे.
आयसीसीने गेल्या आठवड्यात 2024 ते 2031 या कालावधीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात या बदलांवर चर्चा झाली होती. मात्र, त्यावेळी भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, वेस्ट इंडीज व दक्षिण आफ्रिका या देशांच्या क्रिकेट मंडळांनी काही आक्षेप नोंदवले होते. येत्या काळात या देशांना विश्वासात घेत संपूर्ण स्पर्धा कार्यक्रम निश्चित केला जाणार असल्याचेही आयसीसीने म्हटले आहे.
पुरुषांच्या विश्वकरंडक स्पर्धेत 14 संघ सहभागी होतील, तर टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत 20 संघ सहभागी होतील. केवळ यंदाच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत 16 संघांचा सहभाग असेल व त्यानंतर संघांची संख्या वाढवली जाणार आहे.