दुबई – आयसीसीने जागतिक क्रिकेटचे आगामी पाच वर्षांचे व्यस्त वेळापत्रक जाहीर केले आहे. या पाच वर्षांत क्रिकेट चाहत्यांना तब्बल 777 सामन्यांची पर्वणी मिळणार आहे. 2022 ते 2027 या कालावधीत आयसीसीच्या पूर्ण सदस्य असलेल्या 12 देशांचे संघ कसोटी, एकदिवसीय तसेच टी-20 या तीनही प्रकारात प्रचंड व्यस्त राहणार आहेत. या कालावधीत जागतिक क्रिकेटमध्ये 173 कसोटी, 281 एकदिवसीय तर तब्बल 323 टी-20 सामने होणार आहेत.
द्विपक्षीय मालिकांसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रकात आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांचाही समावेश आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापासून या वेळापत्रकाचा प्रारंभ होणार आहे. त्यानंतर 2024 साली वेस्ट इंडिज आणि अमेरिका संयुक्तपणे टी-20 विश्वचषकाचे आयोजन करणार आहेत. पाकिस्तानमध्ये 2025 साली चॅम्पियन्स ट्रॉफी, भारतासह श्रीलंका 2026 साली संयुक्तरीत्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन होणार आहे. तसेच 2027 साली दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया संयुक्तपणे विश्वकरंडक स्पर्धा आयोजित करणार आहेत.
तीन देशच खेळणार सर्वाधिक कसोटी
या मालिका आयसीसीच्या जागतिक कसोटी विजेतेपद स्पर्धेचाच भाग असतील. या व्यस्त वेळापत्रकानुसार आगामी पाच वर्षांत भारत, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया सर्वाधिक कसोटी सामने खेळणार आहेत. इंग्लंड 22, ऑस्ट्रेलिया 21 व भारत 20 कसोटी सामने खेळणार आहे.
या संपूर्ण कार्यक्रम पत्रिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील सामन्यांची संख्या वाढणार असून आधीच्या चार सामन्यांच्या जागी पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. यातील एक मालिका 2023-24 साली ऑस्ट्रेलियात तर, दुसरी मालिका 2025-26 साली भारतात होईल. गेल्या तीन दशकांनंतर या दोन संघात पाच कसोटी सामन्यांची मालिका होत आहे. यापूर्वी 1992 साली दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली होती. भारतीय संघ इंग्लंड विरुद्धही पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.