भाडे आणि कर देण्यात व्यावसायिकांना अडचणी येणार
पुणे – करोना व्हायरसमुळे गेल्या आठवड्यात भारतातील रिटेल उद्योगाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचबरोबर आगामी बराच काळ या उद्योगावर नकारात्मक परिणाम रेंगाळणार असल्याचे व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या “सीएआयटी’ने म्हटले आहे. त्यामुळे या उद्योगाला मदत करण्याच्या शक्यतेवर विचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या संघटनेचे महासंचालक प्रवीण खंडेलवाल यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या पंधरवड्यामध्ये रिटेल उद्योगाचे 30 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. या उद्योगात सात कोटी व्यापारी काम करतात आणि त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांची संख्या 45 कोटीवर असल्याचा दावा त्यांनी केला. करोना व्हायरसचा परिणाम जरी लवकर समाप्त झाला तरी रिटेल उद्योगाला या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. ते म्हणाले की, बहुतांश दुकानदारांनी आपले काम कमी केले असले तरी कर्मचाऱ्यांना पगार द्यावा लागत आहे. या उद्योगाला या परिस्थितीतही दुकानाचा भाडे, त्याचबरोबर कर द्यावेच लागणार असल्याचे ते म्हणाले. त्यामध्ये त्याना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
वाहतूक व्यवस्था कोलमडल्यामुळे पुरवठासाखळी खंडित झाली आहे. ही पुरवठासाखळी पूर्ववत होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागू शकता. उद्योगात काम करणारे बरेच कर्मचारी लॉकडाउनमुळे आपल्या गावी परतले आहेत. त्यामुळे पुढील सहा महिने तरी या उद्योगाला मनुष्यबळाची अडचण सहन करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.