मुंबई: राज्यातील सत्ता स्थापनेच्या घडामोडी आता अंतिम टप्प्यात आल्या असून, सत्तेची कोंडी आता लवकरच फुटणार आहे. या अनुषंगानेच दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली आहे.
काँग्रेस नेत्यांच्या या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करणार असल्याच आता जवळपास निश्चित मानले जात आहे. तीन पक्ष एकत्रित येऊन सरकार स्थापन करणार असल्याने सरकार चालवताना मतभेत किंवा काही अडचणी उद्भवू नयेत म्हणून तिन्ही पक्षांकडून एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार, असल्याची माहिती सुत्रांकडून समोर येत आहे.
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचा कारभार सुरळीत चालावा, तिन्ही पक्षांमध्ये एकसुत्रता आणण्यासाठी 1 ते 12 सदस्यांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये मुख्यमंत्री, मंत्री आणि तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते असतील, अशी माहिती सुत्रांकडून समजते आहे.
दरम्यान, आजच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत सत्ता स्थापनेच्या सर्व मुद्द्यांवर एकमत झाले आहे. महाराष्ट्रात पर्यायी सरकार स्थापनेसाठी चर्चा सुरु आहे. उद्या आम्ही मुंबईला जाऊन घटकपक्षांशी चर्चा करु, त्यांना आतापर्यंत झालेल्या चर्चेची माहिती देऊ, त्यानंतर आम्ही शिवसेनेशी चर्चा करु, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.