ग्रामीण भागात नागरिकांची मानसिकता बदलेना
जिल्ह्यातील अनेक हॉटेल गिऱ्हाईकांअभावी बंदच
– राहुल गणगे
पुणे – करोनामुळे सहा महिन्यांपासून बंद असलेली जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, तसेच बिअर बार राज्य सरकारच्या निर्णयानंतर सोमवार (दि. 5) पासून सुरू करण्यात आली आहेत.परंतु करोनाच्या धास्तीने ग्राहक हॉटेल्स, रेस्टॉरंटकडे फिरकत नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील अनेक हॉटेल अध्याप बंदच आहेत. यामुळे करोनाची धास्ती अन् हॉटेल व्यवसायिकांवर मंदी अशी अवस्था ग्रामीण भागात निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात हजारो ढाबे व लहान हॉटेल्स असून तितकेच हॉटेल व बिअर बार आहेत. काही रेस्टॉरंटमधील पार्सल सेवा सध्या सुरू आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनंतर आता प्रथमच हॉटेल्स सुरू झाली आहेत. ती 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यात येणार असली तरी शासनाचे निर्बंध, करोनाचा प्रादुर्भाव यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद अध्याप मिळतच नाही, ग्राहकांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने प्रत्येक कर्मचाऱ्याला आणि ग्राहकांनाही मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.
करोनामुळे मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसायिकांची उलाढाल ठप्प झाली होती. सर्वाधिक छोटे-मोठी दुकाने आणि उद्योगधंदे बंदच आहेत. त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. जिल्ह्यातील खानावळी, उपहारगृह, घरगुती डबे, असे छोट्या मोठ्या व्यवसायिकांना मोठा फटका बसला आहे.
हॉटेलचे भाडे, कामगारांचे पगार, कर्जाचे हप्ते अशा अनेक समस्या सध्या हॉटेल व्यवसायिकांना भेडसावत आहेत. त्यामुळे अनेक व्यवसायिकांनी आपली हॉटेल्स बंदच ठेवली आहेत. करोनामुळे या व्यवसायांना मोठी घरघर लागली आहे. त्यामुळे अनेक व्यवसायिकांचे कंबरडे मोडले आहे. अनेक व्यवसायिक शेतीकडे वळाले आहेत.
तर काहींनी हॉटेल व्यवसाय कायमचा लॉकडाऊन केला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या मानसिकतेत मोठा बदल झाला आहे. करोनाच्या भीतीने नागरिक बाहेरचे खाणे टाळत आहेत. त्याचा फटका हॉटेल व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपला दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे. यामुळे या व्यवसायिकांना उभारी मिळण्याची गरज आहे.
अशी घ्यावी काळजी
– ग्राहकांची थर्मल गनद्वारे तपासणी करावी
– मास्क घातलेल्या ग्राहकांनाच प्रवेश
– ग्राहकांच्या नोंदी ठेवण्यात येणार
– डिजिटल पेमेंटला प्राधान्य- कर्मचाऱ्यांना मास्क, ग्लोव्हज बंधनकारक
– हॉटेल, रेस्टॉरन्टचे वारंवार निर्जंतुकीकरण
लॉकडाऊन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यानंतर सरकारने पार्सल सेवेला परवानगी दिली. परंतु त्यामध्येही ग्राहक धजावत नाहीत. यामुळे 15 दिवसातच बंद करावे लागले. करोनामुळे हॉटेल व्यवसाय पुर्णतः कोलमडून गेला आहे. ग्राहकांची मानसिकता बदलण्यास किती कालावधी लागेल याचा नेम नाही. त्यामुळे शासनाने जरी परवानगी दिली असली तरी उभारी घेण्यास फार काळ लागणार आहे.
– किसन मोरे, हॉटेल व्यवसायिक, शिक्रापूर