औंध – बाणेर, बालेवाडी परिसरात आयटी पार्क असल्यामुळे “खर्चीक’ ग्राहकांची संख्या येथे मोठ्या प्रमाणात होती. यातून या भागातील उलाढालही मोठी होती. पुण्यातील खवय्ये चमचमीत जेवण तसेच पार्टीसाठी येथे येत होते. आयटी मधील नोकदार युवक-युवतींची गर्दी विकेंडला हाय स्ट्रीट सारख्या भागांत होत होती. सर्व हॉटेल्समध्ये वेटींग असायचे. परंतु, करोना आणि त्यामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर सलग दोन वर्षे येथील विकेंटचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे.
पुणे शहराचे आयटी हब असलेल्या बाणेर, बालेवाडी परिसरात सर्वाधिक उलाढाल होत होती ती हॉटेल व्यवसायात. परंतु, सतत दोन वर्षे करोना आणि लॉकडाऊन यामुळे येथील व्हेज, नॉनव्हेज, रेस्टारंट, बार, पब अशी सर्वच प्रकारची हॉटेल्स् बंद पडली आहेत. या हॉटेलाचा दररोजचा व्यवसाय 1 ते दीड लाखापर्यंत होत होता तो आता दिवसाला 10 ते 20 हजार होत आहे.
बाणेर, बालेवाडी परिसरातील 50 टक्के हॉटेल्सही बंद झाली आहेत. बाणेर, बालेवाडीतील काही फेमस हॉटेल्स् भाडे तत्त्वावर घेतलेल्या जागेत आहेत. या जागेला दोन ते तीन लाख रुपयापर्यंत मासिक भाडे आहे. त्यातही, कर्मचाऱ्यांचा पगार व इतर खर्च पाहिला तर पार्सल सुविधेवर हा व्यवसाय चालविणे कठिण जात आहे.
करोनावरील लस, औषध बाजारात आले असले तरी जेवणासाठी ग्राहक अद्यापही बाहेर पडत नाहीत तसेच अशा परिस्थितीत हॉटेल सुरू ठेवायची असली तरी सोशल डिस्टन्सच्या नियमानुसार निम्मेच ग्राहक बसू शकतील त्यामुळे या व्यावसायाचे आर्थिक गणितच चुकत आहे. त्यामुळे हॉटेल बंद करण्याचाच पर्याय अनेकांनी निवडला आहे.