पंढरपूर – विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तास्थापनेसाठी घोडेबाजारावरुन आरोपांच्या फैरी झडत आहे. अशातच अकलूजमध्ये मात्र खराखुरा घोडेबाजार फुलाला आहे. येथील रुद्र आणि संकरा या अश्वांना प्रत्येकी 50-50 लाखांची मागणी आली आहे.
कार्तिक यात्रेनंतर अकलूजमधील घोडेबाजार हा आता देशातील मुख्य घोडेबाजारात गणला जाऊ लागला आहे. सध्या देशभरातून अडीच हजार दर्जेदार अश्व या बाजारात दाखल झाले आहेत. पहिल्या आठ दिवसातच या बाजारात जवळपास 5 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
राज्यातील सत्तास्थापनेसाठी घोडेबाजार होईल की नाही माहीत नाही. पण, अकलूजचा घोडेबाजार नक्कीच बहरला आहे. या बाजारात रुद्र आणि संकर या अश्वांना या बाजारात 50 लाख रुपयाची मागणी होऊनही विक्री झालेली नाही. राज्यभर जास्त पाऊस काळ झाल्याने यावर्षी अकलूज येथील घोडेबाजार विक्रमी भरला आहे. यंदा उद्घाटनापूर्वीच 100 घोड्यांच्या विक्रीमुळे झाल्याने बाजार विक्रमी ठरणार आहे.
अकलूज बाजारात उच्च किमतीच्या दर्जेदार घोड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनेक व्यापारी ठेवणीतले घोडे विक्रीस आणत असतात. बाजारात राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, दिल्ली या भागातील जवळपास 90 ते 100 व्यापारी आपले घोडे घेऊन दाखल झाले आहेत.
या बाजारात 50 हजारांपासून 50 लाखापर्यंत घोड्यांच्या किमती असून यात पंचकल्याणी, नुखरा, अबलख, काटेवाडी, पंजाबी, मारवाड, सिंध अशा विविध प्रकारच्या अश्वांना पाहण्यासाठी देशभरातून खरेदीदार आणि घोडे शौकीन मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागले आहेत.