अरुण गोखले
घराचं खरे घरपण हे टिकून असते ते त्या घरातील गृहलक्ष्मीच्या अस्तित्वावर. प्रत्येक घरातली प्रमुख स्त्री ही त्या घरची गृहदेवता, गृहस्वामिनी, मालकीण असते. तिचं मोल ओळखून तिला तिचा सन्मान आणि प्रतिष्ठा ही त्या घरातील प्रत्येकाने आवर्जून द्यायलाच हवी. नव्हे तसे करणे हे कुटुंबातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे, हे विसरून चालणार नाही.
जीवनविद्येची शिकवण देणारे प. पूज्य वामनराव पै हेसुद्धा आपल्याला सुखी जीवन कलेची शिकवण देताना हेच सांगतात की, “बाबांनो! तुम्हाला तुमच्या घरच्या गृहलक्ष्मीचं मोल अजून कसं कळत नाही? कुटुंबातील स्त्री ही फार महत्त्वाची आहे. तिचं स्थान हे आदराच आहे. तिचा मान आणि आदर प्रत्येकाने राखायलाच हवा. ती आपल्या जीवनाशी आई, आजी, पत्नी, बहीण, मावशी, आत्या, काकी, मामी अशा विविध नात्यांनी जोडलेली असते.
आपल्या या महत्त्वपूर्ण सांगाव्यास तुष्टी देताना ते म्हणतात, पद्मपुराणात एके ठिकाणी विष्णू भगवान लक्ष्मीस विचारतात की, “हे देवी! तू चंचल आहेस, अस्थिर आहेस, असं असताना तुला जर एखाद्या ठिकाणी आपण निवास करावा असे वाटले, तर तू कोणत्या घराची निवड करतेस?’
तेव्हा लक्ष्मी म्हणाली, “नाथ! ज्या घरात घरच्या गृहस्वामिनीचा मान राखला जातो, तिचा आदर केला जातो, ज्या घरात आतिथ्य आहे, समाधान, शांती आणि सुसंवाद आहे, स्वच्छता आहे अशा घरात मला आनंदाने राहायला आवडते.’
खरं तर ती तुमच्यासाठी किती भूमिकांवर सहजतेने काम करीत असते. ती तुमचं घर सांभाळते म्हणजे तुमच्या घराची गृहमंत्री आहे. ती तुम्हा आम्हाला खाऊ पिऊ घालते, हवं नको पाहते, अन्न शिजवून जेवायला वाढते म्हणजे ती अन्नमंत्री आहे. आपल्या मुलांचा शिक्षणासंदर्भात ती मुलांचा अभ्यास घेणे, त्यांना शाळेत नेणे-आणणे, त्यांना अभ्यासाला प्रवृत्त करणे, प्रोत्साहन देणे, असं बरंच काही करते, म्हणजेच ती शिक्षणमंत्रीच नाही का? ती कुटुंबातील सर्वांच्या आरोग्याची काळजी घेते, आपण आजारी पडलो तर औषधोपचार-सेवा करते, म्हणजेच ती आरोग्यमंत्रीही आहे. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयात ती आपल्याला प्रसंगी लाख मोलाचा सल्ला देते म्हणजेच ती आपली सल्लागारही आहे. असे असताना आपणच तिचे आपल्या जीवनातले खरं मोल ओळखायला आणि तिचा उचित मानसन्मान राखायला नको का?