संदीप राक्षे
सातारा – शहरालगतच्या डोंगर भागाचे सर्वेक्षण करण्याचा विसर पालिका प्रशासनाला पडला आहे. अतिवृष्टीत वाई, पाटण तालुक्यांमध्ये घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरानजीकच डोंगर व टेकड्यांखाली झालेल्या वस्तीबाबत दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
त्यामुळे केवळ आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारून चालणार नाही तर डोंगर फोडून टेकड्यांवर झालेली अतिक्रमणे, बेकायदेशीर उत्खनन त्वरित थांबवण्याची गरज आहे. मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी सत्तारूढ सातारा विकास आघाडीला काही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
सातारा शहर किल्ले अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याला वसलेले आहे. या भागाला जैवविविधतेने समृध्द डोंगररागांचा वारसा लाभला आहे. सातारा शहरातून वाहणाऱ्या मोठ्या सात ते आठ ओढ्यांचा उगमसुद्धा किल्ले अजिंक्यतारा व त्यांच्या डोंगररांगांमध्येच होतो. मात्र, गेल्या दशकभरात वेगवेगळ्या मार्गाने डोंगराची झालेली झालेली लचकेतोड व ओढ्यांवरील अतिक्रमणांमुळे बदललेले नैसगिंक प्रवाह यामुळे ऐतिहासिक सातारा शहरात अतिक्रमणांची बजबजपुरी बनून माळीणसारख्या दुर्घटनांना आमंत्रण दिले जात आहे का, अशी विचारणा लोक करू लागले आहेत.
पॉवर हाऊस व चार भिंती तसेच माची पेठेतल्या डोंगरी भागांमध्ये डोंगर कुरतडून अनधिकृत पत्र्याची शेडस उभी राहिली आहेत, राहत आहेत. तीन वर्षापूर्वी चार भिंतीलगतच्या सोसायटीच्या पिछाडीच्या डोंगराचा भाग तुटून एका लॉण्ड्री व किराणा माल व्यावसायिकाचे मोठे नुकसान झाले होते.
बोगद्यापासून कासला जाताना डाव्या बाजूच्या दगडी कमानीचे चिरे निसटू लागल्याने तेथेही दरड कोसळण्याचा मोठा धोका आहे. बांधकाम विभागाकडे वारंवार स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी होऊनही अद्यापही हा प्रस्ताव टेबलावरच धूळ खात पडून आहे. बोगद्याच्या डोक्यावरून अजिंक्यताऱ्याच्या कड्यावर वाढत जाणारी झोपडपट्टी ही भविष्यातील धोक्याची नांदी ठरू शकते.
या अतिक्रमणांना पालिकेने वेळीच रोखण्याची गरज आहे. हद्दीत नव्यानेच आलेल्या जगतापवाडी परिसरातून सुरू झालेल्या नवीन विस्ताराचे अतिक्रमण थेट उंटाच्या डोंगरापर्यंत पोहचले आहे. मंगळाई पायथासुध्दा इमारती आणि घरकुलांच्या निमित्ताने चार भिंतीच्या स्मारकाशी स्पर्धा करू लागला आहे.
यवतेश्वरच्या घाट पायथ्याला समांतर रस्ते तयार करून तेथे फोफावलेली गुंठेवारीही तातडीने थांबवण्याची गरज आहे. डोंगर उतार अशास्त्रीय पध्दतीने कापून तिथे सदनिका उभारण्याचा अट्टाहास महागात पडू शकतो त्या दृष्टीने केसरकर पेठ, माची पेठ, बोगदा परिसर, कूपर कारखान्याची पिछाडी, मंगळवार पेठेचा डोंगरी भाग येथील डोंगरफोड आणि बेकायदा उत्खनन भविष्यात गंभीर प्रश्न निर्माण करू शकतात.
सर्वेक्षणाचा शहाणपणा दाखवा
सातारा पालिकेने सुरक्षिततेचा उपाय म्हणून शहरालगतच्या टेकड्यांचे शास्त्रीय सर्वेक्षण करायला प्राधान्य द्यायला हवे. टेकड्यांच्या दगडमातीचे स्तर त्यांची भौगोलिक रचना यांचा शास्त्रीय अभ्यास होत नसल्याने त्यांच्या मूळ रचनेला धोका पोहचत आहे.
पालिकेने भूगर्भतज्ज्ञांची समिती नेमून टेकड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे अतिआवश्यक आहे. मात्र, ते आजपर्यंत न झाल्याने डोंगरी वस्तीतला कोणता भाग धोकादायक आहे हे पालिका प्रशासन ठामपणे सांगू शकत नाही.