पिंपरी – मुंबई बंगळूर महामार्गावर होणाऱ्या अपघातामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघातांची संख्या अधिक असून त्यात अनेकांचा बळी गेला आहे. मात्र वाढत्या अपघाताला नेमके जबाबदार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ओझर्डे गावाच्या हद्दीत 16 सप्टेंबर 2019 रोजी सर्व्हिस रोडवर पंक्चर झालेल्या मोटारीचा टायर बदलत असताना भरधाव वेगात असलेल्या बसने धडक दिली. यामध्ये ख्यातनाम डॉ. केतन खुर्जेकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पाषाण गावाच्या हद्दीत 15 ऑक्टोबर 2019 रोजी पंक्चर झालेल्या एसटी बसचा टायर बदलत असताना भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिल्याने चालक मोहन बांदल आणि वाहक शंकर चव्हाण या दोघांचा मृत्यू झाला. या दोन्ही अपघातातील साम्य म्हणजे पंक्चर झालेल्या वाहनाचा टायर बदलत असताना हे अपघात झाले.
महामार्गावर वाहन सर्व्हिस रोडवर थांबविले तर त्याची पार्किंग लाईट सुरू ठेवेणे गरजेचे असते. याशिवाय जेथे वाहन उभे केले आहे त्या अगोदर काही अंतरावर इतर वाहन चालकांना माहिती मिळावी साठी सूचना देणारा फलक (रेडीअमचा त्रिकोण) ठेवणे गरजेचे असते. मात्र वरील दोन्ही अपघातांमध्ये वाहतुकीचे नियम पाळले नसल्याचे पोलिसांचा म्हणणे आहे.
महामार्गावर अथवा रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची जबाबदारी चालकाची असते. चालकच चुका करतात आणि अपघात होतात. मग तो चालक धडक बसणाऱ्या वाहनाचा असो वा धडक देणाऱ्या वाहनाचा. तांत्रिक बिघाडामुळे अपघात होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. रात्रीच्यावेळी समोरील रस्ता दिसण्याचे प्रमाण दिवसापेक्षा कमी असते.
त्यातच महामार्गावरील धोक्याची वळणे आणि वाहनांचा वेग ही कारणे देखील महत्वाची असतात. वेगाची नशा आणि दारू पिऊन वाहन चालविणे हे देखील अपघाताचे प्रमुख कारण आहे.
चालकाला प्रशिक्षणाचा अभाव
आपल्या देशात कोणीही उठतो आणि वाहन चालवितो. महामार्गावर वाहन चालविण्याचे विशेष प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. मात्र बहुतांश कंपन्या अशा प्रकारचे प्रशिक्षण देत नाही. 90 टक्के चालक कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न घेता महामार्गावर वाहन चालवितात आणि मृत्यूच्या सापळ्यात अडकतात.
हे करा
लेनची शिस्त पाळा
वेगाची मर्यादा पाळा
गरज असल्यास इतर वाहन चालकास मदत करा
हेल्मेट, सीटबेल्टचा
वापर करा
रात्रीच्यावेळी वाहनाचे दिवे सुरू असल्याची खात्री करा
हे करू नका
रस्त्यात कुठेही गाडी उभी करू नका.
नशेत वाहन चालवू नका.
धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करू नका.
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी / वजन घेऊ नका.
वेगावर नियंत्रण ठेवा