नवी दिल्ली – देशात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायदा म्हणजेच यूएपीए कायद्याचा सर्वाधिक वापर उत्तरप्रदेशात झाला असून या कायद्यान्वये जे अटक करण्यात आले आहेत त्यात 30 वर्षांच्या खालील युवकांची संख्या अधिक आहे अशी माहितीही सरकारने सादर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाली आहे.
सरकारने सन 2018 ते 2020 या काळात यूएपीए कायद्या अंतर्गत ज्या लोकांना अटक केली आहे त्यांची माहिती लोकसभेत सादर करण्यात आली. त्यानुसार या कालावधीत 4690 लोकांना अटक करण्यात आली आहे. ज्यांना या कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे त्यातील 2501 म्हणजेच 53.32 टक्के लोक हे 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.
एकूण अटकेपैकी उत्तरप्रदेशात अटक करण्यात आलेल्यांची संख्या सर्वाधिक म्हणजेच 1338 इतकी आहे. उत्तरप्रदेशात अटक करण्यात आलेल्यांपैकी 30 वर्षांखालील अटक तरुणांचे प्रमाण 931 म्हणजेच 69.58 टक्के इतके आहे.
उत्तरप्रदेशाखालोखाल मणिपुरचा दुसरा क्रमांक लागतो, त्या राज्यात या कायद्याअंतर्गत 943 जणांना अटक करण्यात आली आहे. तर जम्मू काश्मिरात 766 जणांना अटक करण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत काल ही माहिती दिली.
सरकारने सांगितले की, या कायद्याचा गैरवापर केला जाऊ नये यासाठीच्या तरतूदी या कायद्याच्या प्रक्रियेतच आहेत आणि आरोपींची संपूर्ण सुनावणी करून कोर्टाकडून त्या बाबतचा निर्णय दिला जातो असेही मंत्र्यांनी नमूद केले. या कायद्याचा सामाजिक कार्यकर्ते, लेखक, पत्रकार व वकिलांवरच गैरवापर करून त्यांना तुरूंगात डांबले जात आहे असा आरोप विरोधकांकडून सातत्याने सुरू आहे.