नवी दिल्ली -देशात मंगळवार सकाळपासून 24 तासांत 507 करोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशात एकाच दिवसातील उच्चांकी करोनाबळींची नोंद झाली. त्यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली आणि तामीळनाडू या 3 राज्यांचा वाटा 70 टक्क्यांहून अधिक राहिला.
संबंधित कालावधीत महाराष्ट्रात सर्वांधिक 245 मृत्यूंची नोंद झाली. तर दिल्लीत 62 आणि तामीळनाडूत 60 बाधित दगावले. तेवढ्याच कालावधीत देशात आणखी 18 हजार 653 नवे करोनाबाधित आढळले. त्यामुळे देशातील बाधितांमध्ये सलग पाचव्या दिवशी 18 हजारांहून अधिक संख्येची भर पडली.
आता देशातील बाधितांची संख्या 6 लाखांचा टप्पा ओलांडण्याच्या स्थितीत आहे. तर मृतांची संख्या 18 हजारांजवळ जाऊन पोहचली आहे. देशात सर्वांधिक बाधित आणि बळींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. तामीळनाडूतील बाधितांच्या संख्येने मंगळवारीच 90 हजारांचा तर दिल्लीने 87 हजारांचा टप्पा ओलांडला. गुजरातमध्ये सुमारे 33 हजार बाधित आहेत.
सध्याची आकडेवारी पाहता देशातील करोना संकटामुळे चिंतेचे वातावरण असले तरी बाधित बरे होण्याचे प्रमाण दिलासादायी ठरत आहे. देशात सध्या 2 लाख 20 हजारांहून अधिक सक्रिय बाधित आहेत. तर करोनामुक्त झालेल्या बाधितांची संख्या 3 लाख 48 हजारांवर पोहचली आहे. त्यामुळे देशातील करोनारूग्ण बरे होण्याचे प्रमाण 59.43 टक्क्यांवर पोहचले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.