पुणे – दुष्काळाचा फटका लिंबाच्या बागांना बसला आहे. परिणामी, उत्पादन घटले असून, आवक कमी होत आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने लिंबाचे भाव वाढले असून, घाऊक बाजारात गोणीस दर्जानुसार 200 ते 700 रुपये भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात 2 ते 5 रुपये भावाने लिंबाची विक्री होत आहे.
याविषयी व्यापारी रोहन जाधव म्हणाले, “पाणी टंचाईमुळे बागांचे 50 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात लिंबाची आवक घटून भाववाढ झाली आहे. मागणी जास्त असल्याने मागील 25 वर्षांत पावसाळी हंगामात लिंबाला मिळालेला उच्चांकी भाव आहे. येथे नगर, सोलापूर, साताऱ्यातून लिंबांची आवक होते. पावसाळी, हिवाळी आणि उन्हाळी असे लिंबांचे बहर आहेत. उन्हाळ्यात राज्य-परराज्यांतून लिंबाची आवक चांगली झाली. परंतु पावसाळ्याचा हंगाम दुष्काळामुळे वाया गेला.
आवक फक्त 30 टक्क्यांवर
गुलटेकडी बाजार समितीतील व्यापाऱ्यांच्या मते, लिंबाची सर्वाधिक आवक पावसाळ्यात होते. ती दररोज 5 ते 6 हजार गोण्यांची (प्रतिगोणी 15 किलो) असते. त्या काळात लिंबाचे भाव प्रतिकिलो 8 ते 15 रुपयांपर्यंत असतात. परंतु यंदा ही आवक फक्त दीड हजार ते दोन हजार गोण्यांवर आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात भाव मिळत नसल्याने आर्थिक तोटाही सहन करावा लागतो. बदलत्या हवामानात आणि पाणीटंचाईच्या काळात ठिबक सिंचनाचा वापर करून शेतकरी उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, यंदा त्यालाही अपयश आले आहे, असे चित्र आहे.