पुणे,- महानिर्मितीच्या कोराडी येथील औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पातील राखेत किरणोत्सर्गाचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्याचा त्रास स्थानिकांना होत असून अनेक नागरिकांना आजार जडले आहेत. त्यासंदर्भात काही नागरिकांनी तक्रार केल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकल्पाला नोटीस बजावली आहे. त्याचा खुलासा करण्यासाठी महानिर्मितीला पंधरा दिवसांची मुदत दिली आहे.
महानिर्मितीचे कोराडी येथे औष्णिकवर वीजनिर्मिती करणारे सहा संच आहेत. या संचाच्या माध्यमातून तयार होणारी वीज नगरसह, बीड आणि पुणे जिल्ह्याच्या काही भागाला वितरीत होत असते. मात्र, या प्रकल्पासाठी लागणाऱ्या कोळशाच्या राखेत किरणोत्सर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना विशेषत: लहान मुले आणि दम्याच्या रुग्णांना त्याचा अधिक त्रास होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात महानिर्मिती प्रकल्पाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे आणि मुंबई येथील मुख्यालयात तक्रार केली होती. परंतु, प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळाला निवेदन देऊन यात लक्ष घालण्याची विनंती केली होती.
या नोटीशीद्वारे किती राख तयार होते, या राखेची कशी विल्हेवाट लावली जाते, राखेचा उचल करणाऱ्यांकडून या राखेचा वापर कशासाठी केला जातो, शेतीशी संबंधित कोणते उत्पादक राख नेतात, ही राख कोणत्या उद्योगांना अथवा प्रकल्पांना विकण्यात येते याबाबत तातडीने माहिती द्यावी आणि त्यासंदर्भात येत्या पंधरा दिवसांमध्ये खुलासा करण्यात यावा, असे आदेश प्रदूषण नियत्रंण मंडळाने दिले आहेत.
महानिर्मिती कंपनीने या नोटीसला उत्तर दिल्यानंतरच त्यांच्यावर काय कारवाई करता येईल यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी राहूल वानखेडे यांनी दिली.