नवी दिल्ली – मुंबई चित्रपटसृष्टीच्या विरोधात सतत बदनामीकारक उल्लेख करून चित्रपटसृष्टी व तेथे काम करणाऱ्या माणसांच्या विरोधात अशोभनीय शेरेबाजी केल्या प्रकरणात बॉलीवूडमधील काही व्यक्तींनी व संघटनांनी एकत्रितपणे दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
त्यांच्या या याचिकेनुसार हायकोर्टाने अर्णब गोस्वामी यांचा रिपब्लीक टीव्ही व टाईम्स नाऊ या दोन वाहिन्यांना याविषयी खुलासा करून आपले म्हणणे सादर करण्याची सूचना केली आहे. तसेच चित्रपटसृष्टीतील व्यक्तींच्या विरोधात बदनामीकारक मजूर किंवा बातम्या प्रसारीत करण्यासही कोर्टाने मनाई जारी केली आहे. त्यानुसार आम्ही आचारसंहिता बाळगू असे आश्वासन या मीडिया हाऊसेच्यावतीने कोर्टात आज देण्यात आले.
चित्रपटसृष्टीतील चार संघटना आणि 34 निर्मार्त्यांनी एकत्रितपणे रिपब्लीक टीव्ही व टाईम्स नाऊ या दोन वाहिन्यांच्या विरोधात ही याचिका दाखल केली आहे. आमच्या क्षेत्रात व आमच्या खासगी आयुष्यात या वाहिन्यांनी ढवळाढवळ चालवली असल्याचा आरोपही या याचिकेत करण्यात आला आहे.
आमच्या विरोधात बदनामीकारक माहिती देण्यास या वाहिन्यांचे अर्णब गोस्वामी आणि टाईम्स नाऊचे राहुल शिवशंकर तसेच अन्य संबंधातांना बंदी घालण्यात यावी, अशा मागणीही चित्रपटसृष्टीतील लोकांनी केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 डिसेंबर रोजी होणार आहे.