अनेक वर्षांपासून रखडले होते काम
कोंढवा – उंड्री-वडाचीवाडी रस्त्यावरील अनेक सोसायट्या व नागरिकांना जाण्यासाठी रस्ताच नसल्याने या भागातील रहिवाशी हैराण झाले होते. रस्ता नसल्याने अनेक समस्या उद्भवत असल्याचे पाहून कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता उंड्री गावचे सरपंच निवृत्ती बांदल यांनी स्वतः पुढाकार घेऊन निरपेक्ष भावनेने सर्व रहिवाशांना बरोबर घेवुन स्व:खर्चातून या रस्त्याचे काम सुरू केल्याने गेल्या अनेक वर्षांपासूनची रस्त्याची जीवघेणी समस्या मार्गी लागणार असल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
याबाबत माहिती देताना सरपंच निवृत्ती बांदल म्हणाले, की उंड्री-वडाचीवाडी या मार्गावर अनेक गृहनिर्माण सोसायट्या उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे विविध भागातून आलेल्या नागरिकांनी सदनिका घेतल्या आहेत. मात्र अनेक बांधकाम व्यावसायिकांनी रस्ते, पाणी, ड्रेनेज आदी सुविधा अपुऱ्या प्रमाणात दिल्याने अनेक समस्या उद्भवत आहेत. गाव नुकतेच पालिकेत समाविष्ठ झाल्याने पालिकेकडूनही पुरेसा निधी उपलब्ध होत नाही त्यामुळे विकासकामे रखडली आहेत.
उंड्री-वडाचीवाडी रस्त्यावरील स.नं. 39 मध्ये असणाऱ्या सिद्धिविनायक लोटस, के. सी. ब्लॉसम, के. पी. ग्रॅडीअर या सोसायट्यांना जाण्यासाठी रस्त्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरीकांना मोठा मनस्ताप सोसावा लागत होता. त्यामुळे कोणत्याही निधीची वाट न पाहता स्वखर्चातून हे काम सुरु केले आहे.
ऊंड्री गावच्या रखडलेल्या विकासकामांसाठी स्थानिक खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप व नगरसेवक गणेश ढोरे यांच्याकडे पत्रव्यवहार केला असून लवकरच निधी उपलब्ध होईल तरी उंड्रीचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन बांदल यांनी यावेळी दिले.
यावेळी अभिजित देशमुख, धनंजय बोत्रे, के. सी. पाडवी, अविनाश चिपाडे, दत्तात्रय डोके, अविनाश मेटकर, नवनाथ इंगोले व मोठ्या संख्येने महिला व नागरीक उपस्थित होते.