पुणे – आगामी काळात राज्यातील हवामान कोरडे राहणार असल्याने उन्हाचा चटका पुन्हा वाढणार आहे.तापमानाचा पारा वाढत असून येत्या दोन दिवसात तो चाळीशी पर्यत जाईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
गेल्या आठवडयात राज्यात अचानक झालेल्या पावसाळी वातावरणामुळे तापमानात मोठी घट झाली होती, दिवसाचे कमाल तापमान 34 अंशा पर्यत खाली घसरले होते.त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून तापमानात पुन्हा वाढ होण्यास सुरवात झाली आहे.कोकण वगळता राज्यातील मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या तापमानात वाढ झाली आहे.राज्यात सर्वाधिक तापमान आज अकोला येथे 42.2 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. याशिवाय सोलापूर, उस्मानाबादमधील तापमान सुद्धा आज चाळीस अंशापर्यत गेले होते. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा असून, राज्याच्या कमाल तापमानात दोन ते चार अंशांची वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पुणे शहरात ही तापमानाचा पारा आज 38 अंशापर्यत पोहचला आहे. येत्या 48 तासात तापमान हे चाळीस अंशा पर्यत पोहचले असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. राज्यातील कमाल तापमानाचा पारा पुन्हा वर सरकू लागला आहे.विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तापमान पुन्हा अंशांच्या वर गेले होते. जळगाव, मालेगाव, सोलापूर, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वशिम, वर्धा, यवतमाळ येथे उन्हाचा चटका वाढला आहे.