नवी दिल्ली- पुढच्या वर्षी देशभरात उष्णतेची लाट तब्बल 18 दिवस जाणवणार अहे. वाढत्या तापमानवाढीमुळे 2064 पर्यंत उष्णतेच्या लाटेचा दाह कायम राहणार आहे. नाइन क्लायमेटफ या मॉडेलवरून तापमानवाढीबाबत हवामानतज्ञांनी हा इशारा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा प्रचंड पारा वाढला आहे. महाराष्ट्रातही नागपूर, चंद्रपूर, अकोला या ठिकाणी उन्हाचा पारा वाढलेला पाहण्यास मिळाला. उष्मा वाढल्याने लोकांना उकाड्याचा प्रचंड त्रासही सहन करावा लागतो आहे. मार्च महिन्याच्या मध्यापासूनच उन्हाचा कडाका जाणवू लागला होता. विदर्भ, मराठवाडा, मुंबईसह राज्यभरात कडक उन्हाळा होता यात काहीही शंका नाही. त्याचप्रमाणे देशातही उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये सर्वाधिक तापमानाचे दिवस नोंदवले गेले. देशभरातले सर्वाधिक तापमान हे राजस्थानतल्या श्री गंगानगर या ठिकाणी नोंदवले गेले. उन्हाचा पारा 49.6 अंशांवर नोंदवला गेला.
जून महिना सुरू झाला की पावसाचे वेध लागतात. आजच हवामान खात्याने भारतात यावर्षी सरासरी 96 टक्के पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे. एकीकडे उन्हामुळे चटके बसत असताना ही काहीशी आल्हाददायक बातमी आहे.