मुंबई – राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. साकीनाका आणि डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर आता कल्याणमध्ये एका 8 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच महाबळेश्वरमध्येही एका मुलीवर बलात्काराची घटना समोर आली आहे. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना माझे एकच सांगणे आहे. ही वेळ गायब होण्याची नव्हे, तर अत्याचाराचे हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची आहे. आपल्या माता-भगिनींवर ही वेळ ओढवलेली असताना कुठला कुटुंबप्रमुख इतर राज्यांमधली परिस्थिती दाखवेल? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. स्वतःला महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणवणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या दीड वर्षांपासून दुर्दैवाने जनतेचा आवाजच ऐकू येत नाही, असा टोला चंद्रकांतदादांनी लगावला आहे.
आज महाराष्ट्रात सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांवर अशाच प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. अशावेळी या सरकारकडून, विशेषतः गृहमंत्र्यांकडून ठोस पाऊले उचलण्यासाठी दाखवला जाणारा हा निष्काळजीपणा म्हणजे गुन्हेगारांना दिलेले प्रोत्साहन समजावे का, असा सवालही पाटील यांनी केला आहे.