सविंदणे, दि. 2 (वार्ताहर) -येथे धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर बुधवारी (दि. 2) जेरबंद झाला आहे. एका बिबट्याने दोन दिवसांपूर्वी आई गोट फार्ममधील दहा बोकडांवर हल्ला करून ठार मारले होते. तर नऊ बोकडांना गंभीर जखमी केले होते. वन विभागाने याची तात्काळ दखल घेत या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता. पुन्हा एकदा बिबट्या हल्ला करण्यासाठी आला असता अलगद पिंजऱ्यामध्ये अडकला.
संरक्षक भिंतीच्या शेजारच्या झाडावरून शुक्रवारी रात्री उडी मारून बिबट्याने विनायक नरवडे यांच्या गोठ्यात प्रवेश करुन 10 बोकडांचा फडशा पाडला होता. तसेच 9 बोकड गंभीर जखमी केले होते. या हल्ल्यात नरवडे याचे अंदाजे 15 लाखांचे नुकसान झाले होते. या घटनेनंतर वनविभागावर चोहोबाजूंनी टीका झाली होती. वनविभागाने तातडीने या भागात पिंजरा लावल्याने बुधवारी (दि. 2) बिबट्या पिंजऱ्यात अडकला.
हा बिबट्या अंदाजे दीड वर्षे वयोगटाचा आहे. या बिबट्याची रवानगी माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रात केली जाणार आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली. दरम्यान या परिसरात अजुनही बिबट्याचे दिवसा दर्शन घडत आहे. याचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहे.